August 8, 2026

अन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

0
IMG-20260808-WA0005(1)
Spread the love

पुणे : डॉक्टरांवर गेल्या काही दिवसांत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून सतत हल्ले, पोलिस तक्रारी यांसारखे काही ना काही होत आहे. तसेच समाजकंटकांकडून केल्या जाणाऱ्या खोट्या तक्रारींमुळे पोलिसांकडूनही डॉक्टरांना त्रास दिल्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी डॉक्टर प्रोटेक्शन फोर्सच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आंदोलकांनी निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन दिले.

डॉक्टरांना न्याय मिळावा, खोट्या तक्रारींना आळा बसावा आणि वैद्यकीय व्यवसायाला संरक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. डॉक्टर हे समाजाचे रक्षक आहेत. मात्र त्यांच्याविरोधातच अनेकदा धमक्या, मारहाण, पोलीस तक्रारी, दवाखान्याची तोडफोड अशा घटना घडतात. यामुळे डॉक्टरांचा मानसिक छळ होतो आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते. याकडे शासकीय यंत्रणेने वेळीच लक्ष द्यावे यासाठी डॉक्टर प्रोटेक्शन फोर्सचे मुख्य समन्वयक उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. शिवराज पाटील, डॉ. मंदार सावजी, डॉ. संतोष तळेकर, डॉ. अतुल सोनावणे, डॉ. समीर बदामी, डॉ. सिद्धार्थ शिंदे, रुग्ण हक्क परिषदेच्या अपर्णा मारणे साठे यांच्यासह शेकडो आंदोलक सहभागी झाले होते.

यावेळी संघटनेने डॉक्टरांवरील हल्ले, अत्याचाराविरोधात तत्काळ कठोर कारवाई करावी, डॉक्टरांविरोधात तक्रार असेल तर पोलीसांनी चौकशीपूर्वी त्यांना आरोपी किंवा गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नये, डॉक्टरांचा सन्मान राखला जावा यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात यावे या मागण्या प्रामुख्याने मांडल्या. डॉक्टर, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन यांच्यात नियमित समन्वय बैठक आयोजित करावी, जिल्हास्तरावर डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरुपी समन्वय समिती स्थापन करावी, यांसारख्या मागण्या करण्यात आल्या.

उमेश चव्हाण म्हणाले, “डॉक्टर सुरक्षित असतील, तरच समाजाला चांगल्या आरोग्य सुविधा मिळू शकतात. त्यामुळे आम्ही केलेल्या मागण्यांचा गांभिर्याने विचार व्हायला हवा. डॉक्टरांनी जर काम करणे बंद केले तर समाजाचे जगणे अवघड होईल. त्यामुळे त्यांचा माणूस म्हणून विचार व्हायला हवा. रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी शांतपणे गोष्टी समजून घेऊन, डॉक्टरांशी योग्य पद्धतीने संवाद साधायला हवा. जेणेकरुन डॉक्टरांना त्यांचे काम करता येईल आणि समाजातील कोणत्याच घटकाला त्रास होणार नाही.”

डॉ. अवसाफ यांनी डॉक्टरांची बाजू मांडताना रुग्ण डॉक्टरांना देवाचा दर्जा देतात. मात्र तेही माणूस असतात हे लक्षात घेत नाहीत. कोणताही डॉक्टर रुग्णाचा जीव वाचवण्याचाच प्रयत्न करत असतो. पण आरोग्याच्या तक्रारी हाताबाहेर जातात, तेव्हा डॉक्टरांकडेही काही पर्याय उरत नाही, हे रुग्णांनी समजून घ्यायला हवे. अनेकदा विनाकारण डॉक्टर, हॉस्पिटल यांना बदनाम केले जाते. याचा डॉक्टरांना तर ताण होतोच. पण पोलीस, प्रशासन, कायदा व्यवस्था या सगळ्यांवरच याचा ताण येतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी