July 2, 2025

शिक्षणात योग्य नियोजन आणि सातत्यावर यश अवलंबूनअम्युनेशन फॅक्टरी खडकीचे मुख्य महाव्यवस्थापक अरुण ठाकूर ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमध्ये दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचे

0
IMG-20250628-WA0040
Spread the love


पुणे : भारत आज जागतिक पातळीवर एक ‘रोल मॉडेल’ म्हणून उभा आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे जग भारताकडे सामर्थ्य असलेला देश म्हणून पाहते आहे. कुठलाही विकसित देश ज्या ठिकाणी पोहोचलेला नाही, तिथे आज भारत आपले नेतृत्व दाखवत आहे. टॅलेंट पेक्षा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगला प्राधान्य दिल्यामुळे या गोष्टी शक्य होतात. युद्धाप्रमाणेच शिक्षणातही यश हे फक्त गुणांवर नव्हे, तर योग्य नियोजन, सातत्य, आणि कौशल्यविकासावर अवलंबून आहे, असे मत अम्युनेशन फॅक्टरी खडकीचे मुख्य महाव्यवस्थापक अरुण ठाकूर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्या वतीने जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमध्ये दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजन स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल मध्ये करण्यात आले होते. यावेळी महिला कल्याण संघाच्या अध्यक्ष डॉ. वैशाली ठाकूर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस
अमोल केदारी, डॉ.अ.ल.देशमुख, संस्कार वर्ग प्रमुख विजय भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, अतुल चव्हाण, राजाभाऊ घोडके, विश्वास पलुसकर, माऊली रासने, सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालक राजाभाऊ पायमोडे, अण्णा रासकर, राजू वाईकर आदी यावेळी उपस्थित होते.

कौशल्य विकास आधारित आणि रोजगारभिमुख असे सुमारे २५ ते ३० कोर्स दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि विविध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहेत. या माध्यमातून टेक महिंद्रा आणि टाटा ड्राईव्ह यांच्यासारख्या नामवंत संस्था दगडूशेठ गणपती ट्रस्ट बरोबर जोडल्या गेल्या आहेत. आतापर्यंत सुमारे ८५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घेतला आहे. पालकत्व योजनेमधून आत्तापर्यंत जवळपास २५० विद्यार्थी पास आऊट झाले असून, आपापल्या क्षेत्रात उत्तम रोजगार मिळवत आहेत. यामध्ये पीएचडी ला १ विद्यार्थी असून ४२ विद्यार्थी इंजिनियर झाले आहेत. बरेच विद्यार्थी उच्चशिक्षित असून जवळपास १०० विद्यार्थी पदवीधर झाले आहेत.

योजनेतील माजी विद्यार्थी समाधान कांबळे म्हणाला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने माझ्या शैक्षणिक वाटचालीत मदतीचा हात दिल्यामुळे आज मी शास्त्रज्ञ होण्यापर्यंतचा टप्पा गाठू शकलो. सोलापूर जिल्ह्यातील छोटयाशा गावातला मी असून शिक्षणासाठी आम्ही पुण्यात आलो. मुलींच्या शिक्षणासाठी माझे वडील ३ बाय ३ च्या खोलीत पुण्यात झोपडपट्टीत राहिले. अशा वडिलांचा मी मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. शालेय शिक्षणानंतर गरवारे महाविद्यालयातून मी बीएससी आणि एमएससी करून फिजिक्स शिकण्याची भूक भागविली.

तो पुढे म्हणाला, ज्ञानाच्या महासागरात थेंब टाकण्याचे काम म्हणजे संशोधन, तेच करण्याची वाटचाल आयसर पुणे येथून सुरु केली. संशोधन क्षेत्रात जायचे हे अहमदाबाद येथील इंटर्नशिप मध्ये ठरविले. ‘कण भौतिकशास्त्र’ यामध्ये मला शिकायचे होते, त्यामुळे आयआयटी मद्रास येथे माझी निवड झाल्यानंतर त्यावरच गेली ३ वर्षे मी संशोधन करत आहे. आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या टीम चा देखील मी भाग असल्याचा मला अभिमान आहे. ब्रह्माण्डाचे गूढ उकलण्याचे काम आम्ही करतो. दरम्यान माझे रिसर्च पेपर देखील प्रसिद्ध झाले आहेत. प्रधानमंत्री रिसर्च फेलोशिप साठी माझी निवड झाली आणि मला ती मिळाली आहे. यामागे जय गणेश योजनेचा वाटा मोठा असून त्याचे आम्ही भाग आहोत. ट्रस्टने त्यांच्या तिजोरीची दारे गोर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी उघडी केली आहे. त्यामुळे याचा लाभ आजही माझ्यासारख्या अनेकांना मिळत आहे.

योजनेतील इयत्ता १० वी मधील सेजल धावडे या विद्यार्थिनीने ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या यशात ट्रस्टचा खूप मोठा वाटा आहे असे तिने सांगितले. आर्किटेक्चर होण्याचे तिचे ध्येय आहे. तर, इयत्ता १२ वी मध्ये प्रज्वल केदारी हा ८२ टक्के गुण मिळवून योजनेत प्रथम आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना, ट्रस्टचा मोलाचा मदतीचा हात मिळाला, राहण्याची सोय झाली. मी शिक्षण पूर्ण करून इंजिनीयर होऊन योजनेतील पुढील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार, असे त्याने सांगितले.

डॉ.अ.ल. देशमुख म्हणाले, यशासाठी दहावीची टक्केवारी हे एकमेव मोजमाप नसते. केवळ ६२-६४% गुण मिळवलेले विद्यार्थी आज जागतिक स्तरावर पोहोचले आहेत. गुणांपेक्षा गुणवत्ता, दृष्टीकोन आणि संघर्षाची तयारी महत्त्वाची आहे. ही गुणवत्ता वाढवण्यासाठी जय गणेश पालकत्व योजना खऱ्या अर्थाने मुलांची जडणघडण करते.

प्रास्ताविकात ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, मागील १५ वर्षांपासून ही योजना सुरु आहे. आज योजनेतील विद्यार्थ्यांना मिळालेले यश समाजासमोर येत आहे. संस्कार व वळण देणारे अनेक विभाग या योजनेत आहेत. उत्तम नागरिक घडावा, हा यामागील उद्देश आहे. योजनेतील विद्यार्थी आज समाजातील वेगवेगळी क्षेत्रात स्थिरावले आहेत, हे योजनेचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

  • फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्या वतीने जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमध्ये दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजन स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल मध्ये करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button