September 9, 2026

दलित साहित्य ही समाजाची गरज ‘उर्गेंन आर्ट फेस्टिवल’ मध्ये ज्येष्ठ साहित्यिकांची भावना

0
IMG-20260904-WA0039
Spread the love

करुणादीप फाउंडेशन आणि त्रिरत्न वैरोचना सेंटर आयोजित उर्गेंन आर्ट फेस्टिवलचा समारोप

पुणे : अस्पृश्यता ,जातीयता आणि त्यामधून माणसा माणसांमध्ये भेदाभेद आजही अस्तित्वात आहे . त्यामुळे दलित समाजाचे दुःख आणि वेदना आजही तसाच कायम आहेत. या वेदनेला फुंकर घालून दलित साहित्याने वास्तव मांडले . जातीयता संपवून सामाजिक सलोखा आणि समानता प्रस्थापित करण्यासाठी दलित साहित्याची आजही समाजाला गरज आहे अशी भावना ज्येष्ठ साहित्यिकांनी व्यक्त केली.

करुणादीप फाउंडेशन आणि त्रिरत्न वैरोचना सेंटर यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या उर्गेंन आर्ट फेस्टिवल मध्ये कलाकार परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंतांनी दलित साहित्य आणि त्याचा कलेशी असणारा संबंध त्यांचा संदर्भात चर्चा केली. पद्मश्री ग्नंवाग संपतेन, डॉ. विमलताई एस. थोरात, शाहीर संभाजी भगत आणि कवी नितीन चंदनशिवे या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते.

डॉ. विमल थोरात म्हणाल्या, महाराष्ट्रने सर्वप्रथम दलित साहित्याला जन्म दिला. आज हे दलित साहित्य संपूर्ण भारतामध्ये पसरले आहेत. भारताचे 22 भाषांपैकी 20 भाषांमध्ये सक्रिय लेखक दलितांचा संदर्भात लेखन करत आहेत. दलित साहित्य हे वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित होणे गरजेचे आहे, शब्दशः नसले तरी त्याचा भावार्थ एका वर्षातून दुसऱ्या भाषेमध्ये पोहोचला तर त्यातून दलितांचे दुःखामध्ये समाजाच्या काळापर्यंत पोहोचू शकतात.

शाहीर संभाजी भगत म्हणाले, सत्तेच्या राजकारणापलीकडे एक सांस्कृतिक राजकारण अस्तित्वात आहे . सत्तेचे राजकारण काही क्षण असतात परंतु सांस्कृतिक राजकारण मात्र कायमस्वरूपी असते. दलितांचे दुःख आणि वेदना मांडण्यासाठी समांतर सांस्कृतिक राजकारण उभे करण्याची गरज आहे . मनुवादी आणि ब्राह्मण्यवादी विचारांमधून दलितांवर कायमच अन्याय होत आला आहे, तो जुगारून देण्यासाठी समतावादी, मानवतावादी समाज निर्माण करण्यासाठी दलित साहित्याने आवाज म्हणून त्यांचे दुःख समाजासमोर मांडले पाहिजे.

पद्मश्री ग्नंवाग संपतेन म्हणाले, तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील एकता ,समता बंधुता आणि न्याय यांचा समावेश असणारा समाज निर्माण होणे गरजेचे आहे . त्यासाठी दलित साहित्य हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. देश अखंडपणे समानतेच्या पायावर उभा राहिला तरच खऱ्या अर्थाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला असे म्हणू शकतो.

नितीन चंदनशिवे म्हणाले, कवितेच्या माध्यमातून वंचित आणि उपेक्षितांचे दुःख समस्या मांडले जात आहे ही मी माझे कवी म्हणून कामच समजतो. कोणत्याही कलाकाराला त्याची कला किंवा लेखक आणि कवीला मिळालेली लेखणी याला तेव्हाच खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त होते जेव्हा तो कलाकार कवी अथवा लेखक सर्वसामान्यांचे दुःख जाणून ते आपल्या कलेच्या माध्यमातून समाजासमोर मांडतो . कलेच्या माध्यमातून किंवा लेखणीतून भलेही ते दुःख दूर होणार नाही परंतु ते मांडता येणे गरजेचे आहे आणि ही निर्भीडता प्रत्येक लेखक आणि कवी मध्ये असणे गरजेचे आहे.
संतोष संखद यांनी सूत्रसंचालन केले. दिव्या शिंदे आणि डॉ. अस्मिता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी