शिवराज्याभिषेक दिन म्हणजे हिंदुस्थान साठी युगप्रवर्तक दिनशिवव्याख्याते सौरभ करडे : विश्व हिंदू परिषद पुणे महानगर श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती किल्ले सिंहगड तर्फे शिवशंभू व्याख्यान
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांना पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. त्यामधील ३६ वर्ष हे त्यांचे राजकीय आयुष्य होते. या ३६ वर्षांमध्ये सर्वकाळ त्यांचा युद्ध-लढाया अशा संघर्षामध्ये गेला. स्वराज्य निर्मितीसाठी अहोरात्र झटणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला संपूर्ण हिंदुस्तानमध्ये मान्यता ही शिवराज्याभिषेकामुळे मिळाली. शिवराज्याभिषेक ही केवळ घटनाच नव्हे तर हिंदुस्तानसाठी आणि प्रत्येक हिंदू साठी तो युगप्रवर्तक दिन होता, असे मत शिवव्याख्याते सौरभ करडे यांनी व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषद पुणे महानगर, श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती किल्ले सिंहगड यांच्यातर्फे हिंदू साम्राज्य दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सौरभ करडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन स.प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे मंत्री किशोर चव्हाण, शरद जगताप, केतन घोडके संतोष अनगोळकर आदी यावेळी उपस्थित होते.
सौरभ करडे म्हणाले , पुरंदरचा तह झाल्यानंतर स्वराज्यातील किल्ले आणि हजारो एकर प्रांत शिवरायांना द्यावा लागला. तहातील अटीनुसार औरंगजेबाच्या दरबारामध्ये जावे लागेल. औरंगजेबाच्या दरबारातून सुटून आल्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांनी अडीच वर्ष तह कायम ठेवला, परंतु औरंगजेबाने जेव्हा हिंदू मंदिरांना फोडण्याचा, हिंदूंवर जीजीया कर लादण्याचा आदेश दिला त्यानंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराज पेटून उठले आणि त्यांनी पुढील केवळ ३६ दिवसांमध्ये तहातील सर्व किल्ले आणि प्रांत जिंकून घेतला.
औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर फोडले. हिंदूंवर अत्याचार केले, हे सर्व उघड्या डोळ्यांनी गागाभट्ट आणि कवी भूषण पाहत होते. त्यांनी अखेर हिंदूंचे स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे यासाठी जिजाऊ आई साहेबांची भेट घेतली आणि शिवराज्याभिषेकाची कल्पना जिजाऊ आईसाहेबांसमोर मांडली. ही कल्पना प्रथम शिवाजी महाराजांना खर्चामुळे मान्य नव्हते, परंतु स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळण्यासाठी आणि जिजाऊ साहेबांच्या शब्दासाठी त्यांनी शिवराज्याभिषेकासाठी मान्यता दिली.
शिवराज्याभिषेकामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अहोरात्र कष्ट करून निर्माण केलेल्या स्वराज्याला संपूर्ण हिंदुस्तान मध्ये मान्यता मिळाली. हिंदुस्थानच्या बाहेरून येऊन देशावर राज्य करणाऱ्यां ऐवजी या देशातील मातीमध्ये जन्मलेला राजा प्रथमतः या देशात छत्रपती झाला. शिवराज्याभिषेक ही केवळ एक घटना नव्हती तर त्यानंतर हिंदूंसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी युगप्रवर्तक दिन अवतरले . त्यामुळेच आजही देशातील हिंदू ताठ मानेने जगू शकतात आणि हिंदू म्हणून स्वाभिमानाने राहू शकतात ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपल्यावर उपकार आहेत, असेही सौरभ करडे यांनी यावेळी सांगितले.
किशोर चव्हाण म्हणाले, विश्व हिंदू परिषदेतर्फे दरवर्षी सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती राजाराम महाराज पुल ते किल्ले सिंहगड पर्यंत दुचाकी फेरी व गडावर पालखी सोहळा कार्यक्रम आयोजित केला जातो.परंतु यावर्षी युद्धामुळे झालेल्या इंधन टंचाईमुळे मा.पंतप्रधानांनी देशात इंधन बचतीचे आवाहन केल्याने दुचाकी फेरी रद्द करून यंदा व्याख्यानाचे केले आहे. साजरा केले जातात.
दरवर्षी संघटना तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करते, भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांच्या विचारांनी प्रेरणा मिळावी यासाठी संघटना अहोरात्र कष्ट करत आहे. यासाठी अधिकाधिक तरुणांनी या कार्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन किशोर चव्हाण यांनी यावेळी केले. संतोष अनगोळकर यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास परिषदेचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
