पुण्यात साहित्य केसरी महाकाव्य करंडक २०२६ सोहळा उत्साहात संपन्न; पुण्याचा शुभम आव्हाळे ठरला साहित्य केसरी, मिलिंद चन्ने यांना नाट्यगौरव पुरस्कार प्रदान !
पुणे:
काव्य क्षेत्रातील अत्यंत मानाची समजली जाणारी ‘साहित्य केसरी महाकाव्य करंडक २०२६’ ही राज्यस्तरीय स्पर्धा रविवार, दिनांक ५ जुलै रोजी पुण्यात अत्यंत उत्साहात पार पडली. शाई प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे संपन्न झाली. या अंतिम महासंग्रामात पुण्याच्या शुभम आव्हाळे याने प्रथम क्रमांक पटकावत यंदाचा ‘साहित्य केसरी’ हा बहुमान मिळवला आहे, अशी माहिती शाई प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख निखील सुक्रे यांनी दिली आहे.
कुस्ती क्षेत्रातील ‘महाराष्ट्रकेसरी’च्या धर्तीवर काव्य क्षेत्रात मानाचा तुरा रोवणाऱ्या या स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष होते. “इथे फक्त कविता जिंकते” या घोषवाक्याला प्रमाण मानून संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या ५४ निवडक कवींनी अंतिम फेरीत आपल्या कवितांचे सादरीकरण केले. राज्यभरातून आलेल्या २१५ कवींच्या प्राथमिक फेरीतून या ५४ कवींची निवड करण्यात आली होती.
परीक्षकांनी केलेल्या गुणांनुसार खालील कवींना विजेते घोषित करण्यात आले.
प्रथम क्रमांक (साहित्यकेसरी महाकाव्य करंडक): शुभम आव्हाळे (पुणे) – कविता: ‘पावसा येऊन जा’ (₹५,००१ रोख, मानाचा करंडक, सन्मानपत्र, आकर्षक पेन व डायरी).
द्वितीय क्रमांक: भाग्यलक्ष्मी बाळू क्षिरसागर (सांगली) – कविता: ‘आई तुझंच नाव लावावं म्हणते’.
तृतीय क्रमांक: प्रीती वानखेडे (वर्धा) – कविता: ‘तुळस’.
उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक: निलेश तुरके (यवतमाळ) – कविता: ‘तुझी याद’.
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक: संदीप भिंगीकर (संभाजीनगर) – कविता: ‘व्याकुळ प्रजा’.
विशेष लक्षवेधी पारितोषिक: शरावती किशोर (गडचिरोली) – कविता/विषय: ‘यशोधरा’.
पीपल्स चॉईस अवॉर्ड: मंगेश कवटीकवार (नांदेड).
या सोहळ्याला पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे, प्रसिद्ध व्याख्याते स्वप्नील चौधरी, प्रा. अमोल चीने, कवी सागर काकडे, लेखक शरद तांदळे, युवा वक्ते अक्षय इळके, व्याख्याते ज्ञानराज पांचाळ आणि उद्योगपती नागेश चव्हाण यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
याच कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद चन्ने यांना यंदाचा मानाचा ‘रंगकेसरी नाट्यगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
अशा प्रकारचे कार्यक्रम समाजामध्ये विचारांची पेरणी करतात असे मत ज्येष्ठ लेखक आणि कवी हनुमंत चांदगुडे यांनी केले व्यक्त केले.
स्वप्निल चौधरी म्हणाले की, कविता म्हणजे फक्त भावना व्यक्त करण्याचे माध्यम नसून ते एक प्रभावी शस्त्र देखील आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी.. परिस्थिती मांडण्यासाठी याचा चांगला वापर सध्या होताना पाहायला मिळतोय याचा आनंद आहे.
पुण्याच्या पत्रकार भवन येथे रंगलेल्या या साहित्य केसरी महाकाव्य करंडक 2026 लापेक्षकांनी देखील मोठी उपस्थिती लावली होती. नाट्य, लेखन व काव्य तसेच वक्तृत्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
