काँग्रेसने संविधानाची मोडतोड केली
माजी केंद्रीय मंत्री डॉ. प्रकाश जावडेकर यांचे मत
पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची काँग्रेसने मोडतोड केली. या संविधानाची पुनर्स्थापना करण्याचे काम संघाने केले,’ असे मत माजी केंद्रीय मंत्री डॉ. प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘आणीबाणीचा काळा दिवस’ या विषयावर जावडेकर बोलत होते. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सचिव ॲड. वर्षा डहाळे, शहर सरचिटणीस राघवेंद्र मानकर, माजी नगरसेवक अनुपमा लिमये आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या ‘लोकतंत्र सेनानीं’चा सन्मान करण्यात आला.
जावडेकर म्हणाले,‘आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय आहे. या काळात संविधानातील मूलभूत मूल्यांवर गदा आणण्यात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिकारांवर निर्बंध आणले गेले. प्रसारमाध्यमांवर ‘सेन्सॉरशिप’ होती. त्यामुळे सत्य परिस्थिती नागरिकांपर्यंत पोहोचत नव्हती. समाजात भीती आणि संभ्रमाचे वातावरण होते. या काळात मोठ्या संख्येने राजकीय कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. अनेकांना तुरुंगवास भोगावे लागले, अत्याचार सहन करावे लागले. सक्तीच्या नसबंदी मोहिमेमुळेही नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.’
‘लोकशाहीच्या संरक्षणासाठी सुमारे एक लाख दहा हजार नागरिकांनी संघर्ष केला. हा देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व लढा होता. या संघर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी समाजाने कायम सजग राहिले पाहिजे,’ असेही त्यांनी नमूद केले.
‘आणीबाणीनंतर संविधानात मोठे बदल करण्यात आले. प्रास्ताविकेत ‘सेक्युलरिझम’ आणि ‘सोशालिझम’ या शब्दांचा समावेश करण्यात आला. मात्र, देशात मुळातच सर्वधर्म समभावाची भावना रुजली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात लोककल्याणकारी शासनाला प्राधान्य दिले जात असून, लोकशाही अधिक बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ असेही जावडेकर म्हणाले.
