शिक्षण ही भविष्यातील संपत्तीउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन,आयएसबीएमला विद्यापीठाचा दर्जा देणारआयएसबीएमच्या रजत महोत्सवी दीक्षान्त समारंभात ३०० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
पुणे : शिक्षण ही भविष्यातील संपत्ती आहे. भारत आणि महाराष्ट्र शासन संशोधन व नवोपक्रम आधारित शिक्षणावर भर देत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. २०४७ पर्यंत भारत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या जगात अग्रक्रमावर असेल, असा विश्वास आहे. विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. संस्थेची प्रगती आणि गुणवत्ता लक्षात घेता भविष्यात तिला खासगी विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी शासन सकारात्मक विचार करीत आहे. आवश्यक शैक्षणिक निकष, अधोसंरचना आणि गुणवत्ता मानकांची पूर्तता झाल्यानंतर आयएसबीएमला विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया पुणे येथे 2026 सालचा 25 वा रौप्यमहोत्सवी निमित्त आयोजित दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी 2023-2025 या बॅचमधील सुमारे 300 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या यशाचा, मेहनतीचा आणि शैक्षणिक प्रवासाचा गौरव करणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, तसेच इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अतुल खराटे हे मान्यवर उपस्थित होते. मुळशी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या संस्थापक डॉ. सरोजा अस्थाना पीईजी चे विश्वस्त डॉ. भीष्मराज श्रीवास्तव आणि डॉ. मनोज शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2047 पर्यंत भारत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या जगातील अग्रगण्य राष्ट्र बनेल. आज जगभरात युद्धजन्य आणि आर्थिक अस्थिरतेचे वातावरण असले तरी भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास आणि आर्थिक प्रगतीचे प्रभावी माध्यम आहे.
आयएसबीएम संस्थेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करताना सांगितले की, संस्थेने उद्योगाभिमुख शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय काम केले आहे. आयएसबीएमने शिक्षण क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून संस्थेची प्रगती आणि गुणवत्ता लक्षात घेता भविष्यात तिला खासगी विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी शासन सकारात्मक विचार करीत आहे. आवश्यक शैक्षणिक निकष, अधोसंरचना आणि गुणवत्ता मानकांची पूर्तता झाल्यानंतर आयएसबीएमलाला विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधनाच्या अधिक संधी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक सहकार्य उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. प्रमोद कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. भारत हा संधींचा देश असून विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळावे. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हा स्वामी विवेकानंदांचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. जागतिक स्तरावर अस्थिरता असतानाही भारताची आर्थिक प्रगती मजबूत आहे. भारतीय युवकांमध्ये नवकल्पना, उद्योजकता आणि जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता आहे.
शेखर मुंदडा म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यासाठी जगातील कोणत्याही देशात जाऊन प्रगती केली तरी त्यांनी आपल्या मातृभूमीच्या विकासासाठी योगदान द्यावे. जीवनात केवळ यश नव्हे तर सेवाभावालाही महत्त्व द्यावे. आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा देशसेवा आणि समाजकार्यासाठी खर्च करण्याची भावना विद्यार्थ्यांनी ठेवावी. गुरूशिवाय जीवनाला दिशा मिळत नाही, त्यामुळे गुरूंचे स्थान जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे”.
अतुल खराटे म्हणाले, “ऑइल अँड गॅस, कृषी क्षेत्र, इन्फ्रास्ट्रक्चर यांसह अन्य क्षेत्रांमध्ये भारत अत्यंत प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. विकसित भारत घडवण्यात तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांची मुख्य भूमिका राहणार आहे. पुढील काही काळात भारत जगाचे नेतृत्व करेल. विद्यार्थ्यांनी सतत शिक्षणाचा ध्यास घ्यावा आणि शिकत राहावे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
समारंभादरम्यान विविध विद्यार्थ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. संभवी स्वाईम हिला आयएसबीएम नांदे टॉप परफॉर्मर पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर जया सैनी हिला आयएसबीएम नांदे ऑल राऊंडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिराज सिंह राठोड यांना आयएसबीएम नांदे लीडरशिप पुरस्कार प्रदान करण्यात आला. साकिरा सिन्हा हिला आयएसबीएम कोलकाता बेस्ट अकॅडमिक परफॉर्मर पुरस्कार मिळाला, तर अनुश्या घोष हिला कोलकाता बेस्ट ऑल राऊंडर पुरस्काराने गौरविण्यात आले. गौरव क्षीरसागर यांना एमआयबीएम ऑल राऊंडर बॉईज पुरस्कार मिळाला, तर लीना पाल हिला एमआयबीएम ऑल राऊंडर गर्ल्स पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सच्चितानंदराज रेड्डी, दीपल लखोटिया, आश्वानी राजेसिंग यांनी केले. अर्पिता रॉय यांनी आभार व्यक्त केले.
अधिक माहितीसाठी –
टीम आयएसबीएम
