-लोकपरंपरा पुरस्कार शाहीर हेमंत मावळे यांना जाहीरवीर मारुती चौक येथील २०० वर्षांची कीर्तन परंपरा : शाहिरी परंपरेच्या जतनासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मान
पुणे : शनिवार पेठेतील वीर मारुती चौक येथे शनिवार वीर मारुती उत्सव मंडळाच्या पुढाकाराने आणि गुरुवर्य श्रीराम धोंडूराम दहाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘लोकपरंपरा पुरस्कार’ देण्याची परंपरा सुरू झाली आहे. या वर्षीचा ‘लोकपरंपरा पुरस्कार’ आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांना जाहीर झाला आहे. रविवार, दिनांक १९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता वीर मारुती चौक येथे पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती राम दहाड यांनी दिली.
शनिवार पेठेत पेशवे काळापासून सुरू असलेली आणि आजही अखंडपणे जपली जाणारी कीर्तन परंपरा यंदाही हनुमान जयंतीपासून अक्षयतृतीया पर्यंत सलग १८ दिवस साजरी होत आहे. महाराष्ट्रातील सलग १८ दिवस कीर्तन उत्सव सुरु असणारे हे बहुधा एकमेव मारुती मंदिर मानले जाते. सन २०२४ पासून महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या परंपरांना जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणा-या व्यक्तींना ‘लोकपरंपरा पुरस्कार’ देण्यात येतो.
आचार्य शाहीर हेमंत मावळे यांनी शाहिरी परंपरेच्या जतनासाठी अथक प्रयत्न केले आहेत. तसेच विनामूल्य पोवाडे प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. ही परंपरा अधिक जिवंत राहावी यासाठी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.
कीर्तन उत्सवाच्या या पावन परंपरेत चारुदत्त बुवा आफळे, वासुदेव बुवा बुरसे, वासुदेव बुवा जोशी यांसारख्या नामवंत कीर्तनकारांनी सहभाग घेतला असून, आजही ही परंपरा अखंड सुरू आहे. हा उत्सव कोणतीही वर्गणी न घेता, लोकवर्गणीतून साजरा केला जातो. राम दहाड, महेश पानसे, सचिन दाते, मयुरेश जोशी, अॅड.प्रवीण जोशी व सहकारी मंडळी देखील मंडळाच्या माध्यमातून आपल्या परंपरा जपण्यास उत्साहाने प्रयत्नशील आहेत.
