-जातीयवादाचा काटेरी साखळदंड भारताला पुढे जाऊ देणार नाहीव्याख्याते निलेश धायरकर यांचे मत: जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे व्याख्यानमालेचे आयोजन
पुणे : जातिवाद हा भयंकर मोठा शत्रू आहे. इतर जाती विषयीचा द्वेष आपण निश्चितच कमी करू शकतो. आंतरजातीय विवाह हा त्यातला एक चांगला मार्ग आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले पाहिजे तर काही प्रमाणात जातीवादाचा आपण पराभव करू शकू. जातीयवाद भारताला संपावाच लागेल नाहीतर हा काटेरी साखळदंड भारताला पुढे जाऊ देऊ शकत नाही, असे मत व्याख्याते निलेश धायरकर यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे सहावी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. यामध्ये ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.
निलेश धायरकर म्हणाले, फुटीरतावाद हा देखील गंभीर प्रश्न देशासमोर आहे. संविधान विरोधी काम करणाऱ्या, शस्त्र हातात घेऊ पाहणाऱ्या, जातीच्या संघटना बांधणाऱ्या ठिकाणी आपण सक्रिय नसले पाहिजे, तरच आपण प्रखर राष्ट्रवादी आहोत. इस्लामिक राष्ट्रवाद देखील आपल्याला आव्हान देत आहे. आपण सगळ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद अंगीकारला पाहिजे आणि तो अधिक उच्चतम स्थानी न्यायला पाहिजे, असेही त्यांनी संगितले.
व्याख्यानमालेमध्ये प्रखर राष्ट्रवादी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ॠणानुबंध, डॉ.आंबेडकर यांचे स्त्री विषयक विचार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शोध घेताना, डॉ.आंबेडकर यांचे देशाच्या फाळणी संबंधी विचार अशा विविध विषयांवर वक्त्यांनी मते मांडली.
सामाजिक कार्यकर्ते व व्याख्याते निलेश धायरकर यांसह लेखक व संपादक बापूराव घुंगरगांवकर, नेस वाडिया कॉलेज आॅफ कॉमर्सच्या प्राचार्य डॉ.वृषाली रणधीर, अॅड. क्षितीज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व लेखक भरत आमदापुरे यांच्या मार्गदर्शनासह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर यांनी देखील आपले विचार मांडले.
