August 21, 2026

आजच्या काळात स्त्रीने कौशल्यविकास साधण्याची गरज : प्रा. डॉ. प्रज्ञा कुलकर्णीमहाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘वेदकालीन स्त्री ते मॉडर्न गर्ल’ विषयावर व्याख्यान

0
IMG-20260811-WA0044
Spread the love


पुणे : स्त्री काय शिकली, तिची कार्यक्षमता, विचार काय या विषयी पुरुषांच्या तुलनेत अभ्यास केला जातो. वेदकाळात स्त्रीचे तेज, आत्मविश्वास, तिने जोडलेली नाती, तिची स्वत:विषयी असलेली ठाम मते आणि मांडण्याची मुभा होती. समाजात स्त्रीला मानाचे स्थान होते. द्रष्टेपणा जाणणाऱ्या स्त्रिया समाजात अस्तित्वात होत्या. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना यज्ञ, सामगायन, हवन, अग्निहोत्र याविषयी अधिकार होते. आजच्या काळात स्त्री शिकताना विज्ञान आणि शिक्षणाची सांगड घातलेली दिसत नाही. सद्यस्थितीत स्त्रीने किमान शहाणपण वापरत कौशल्यविकास साधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डेक्कन कॉलेजच्या संस्कृत विभागातील प्रा. डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ. अश्र्विनी धोंगडे पुरस्कृत ‘स्त्री’ व्याख्यानाअंतर्गत सोमवारी ‘वेदकालीन स्त्री ते मॉडर्न गर्ल’ या विषयावर प्रा. डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी त्या बोलत होता. ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. अश्र्विनी धोंगडे अध्यक्षस्थानी होत्या. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कार्यवाह अंजली कुलकर्णी, सुनेत्रा मंकणी उपस्थित होत्या.
प्रा. डॉ. प्रज्ञा कुलकर्णी पुढे म्हणाल्या, वेदोत्तर काळात उपनयन संस्कार, पती निवडी चा अधिकार, विवाह न करण्याचे स्वातंत्र्य, सारथ्य करण्याचा अधिकारही स्त्रियांना होता. मध्ययुगातही स्त्रीला साहित्य, ज्ञान, धर्म, सैनिकी शिक्षण उपलब्ध होते, अशा नोंदी आढळतात. स्त्रिया शिकत होत्या, वरचढ होत्या आणि जिंकतही होत्या. संतांच्या काळात भक्तीसंप्रदायात स्त्री-पुरुषांच्या विचारांमध्ये समानता आढळते. अठराव्या शतकानंतर स्त्री व स्त्री शिक्षणाविषयी भूमिका बदललेल्या जाणवतात. अशा काळात स्त्रीच्या मनात प्रश्न निर्माण होणे, उपलब्ध ज्ञानाने जिज्ञासापूर्ती करण्याचा प्रयत्न करणे आणि स्वतंत्र विचार व संशोधनाचे महत्त्व अधोरेखित होते.
त्या पुढे म्हणाल्या शिकलेल्या प्रत्येक स्त्रीने घराबाहेर पडून अर्थार्जन करणे अपेक्षित नसले तरी समाजाचे देणे देत विचार करून कृती करणे गरजेचे आहे. स्त्रियांमध्ये कीर्ती, स्मृती, मेधा, धारणाशक्ती, क्षमा आदी गुण असून या गुणांना चालना देणे गरजेचे आहे. समाजात स्त्री म्हणजे वेगळी कुणीतरी आहे असे न वागवता विचार करण्याची शक्ती पुढील पिढीला द्यावी. आजच्या काळात स्त्रीला विचार करायला प्रवृत्त करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, आपल्या समाजात स्त्रीवाद हा शब्द फार सैलपणे वापरलेला दिसून येतो. आजची स्त्री कशी आहे हे जाणून घेताना वेदकालीन स्त्रीविषयी अभ्यास करून तुलना होणे आवश्यक आहे. वेदकालासह मध्ययुगातील स्त्रिया, त्यांचे जीवन, आयुष्य समजून घेताना सामान्य स्त्रीचे जीवन अभ्यासणे गरजेचे आहे. आदिमकाल ते कुटुंब व्यवस्थेकडे आलेली स्त्री तसेच आजच्या युगातील स्त्री याचा समान धागा आकलन करताना कुटुंब व्यवस्था सुरक्षित रहावी, सुरळीत चालावी याचा आधारस्तंभ स्त्रीच आहे हे मान्य करणे गरजेचे आहे.
प्रास्ताविकात डॉ. स्वाती महाळंक म्हणाल्या, भारतीय स्त्रीवादाचा मागोवा घेताना स्त्रीची बदलती स्थिती, तिचा वेदकालीन ते आजच्या पिढीतील समानधागा यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. या हेतूने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत डॉ. स्वाती महाळंक, सुनेत्रा मंकणी यांनी केले. तर सूत्रसंचालन अंजली कुलकर्णी यांचे होते. कार्यवाह सुनील महाजन यांनी आभार मानले.
फोटो ओळ : मसाप आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. डॉ. प्रज्ञा कुलकर्णी. समवेत हॉ. स्वाती महाळंक, डॉ. अश्विनी धोंगडे, अंजली कुलकर्णी.
प्रति,
मा. संपादक
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ. अश्र्विनी धोंगडे पुरस्कृत ‘स्त्री’ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
डॉ. स्वाती महाळंक, प्रमुख कार्यवाह, मसाप
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी