भगवंत नामात एकनिष्ठतेने स्थिर होण्यातच खरी तृप्तीह. भ. प. यशोधन महाराज साखरे यांचे कीर्तन ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन
पुणे : भगवंताच्या नामाच्या ठिकाणी एकनिष्ठतेने स्थिर झालात, तर त्या एकनिष्ठतेने स्थिर होण्याचा परिणाम म्हणजे खरी तृप्ती प्राप्त होते. तुम्हाला जर तृप्ती प्राप्त करून घ्यायची असेल, तर भगवन्नामाच्या ठिकाणी एकनिष्ठतेने स्थिर व्हायला हवे, असे प्रतिपादन ह.भ.प. यशोधन महाराज साखरे यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जंगली महाराज रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथे चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ९ आॅगस्ट पर्यंत हा महोत्सव सुरु असून दररोज सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्राच्या विविध भागांतील नामवंत कीर्तनकारांना ऐकण्याची व यामाध्यमातून स्वरब्रह्माची अनुभूती घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
ह. भ. प. यशोधन महाराज साखरे म्हणाले, भौतिक किंवा व्यावहारिक पदार्थांच्या माध्यमातून तृप्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, तर ती तृप्ती तात्कालिक असते. व्यावहारिक, भौतिक पदार्थांच्या मागे लागून तृप्ती प्राप्त होत नाही. भौतिक पदार्थांतून तृप्ती प्राप्त करून घेणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे. यदा-कदाचित तृप्ती प्राप्त झालीच, तरी ती तात्कालिकच असते
जगामध्ये एकमेव शब्दप्रभू म्हणजे माऊली ज्ञानोबाराय असल्याचे सांगत ह.भ.प. यशोधन महाराज साखरे म्हणाले, शब्दप्रभू म्हणजे ज्याच्याकडे शब्द निर्माण करण्याचे आणि त्या शब्दाला अर्थ प्रदान करण्याचे सामर्थ्य आहे. माऊलींच्या शब्दकलेचे वैभव असे आहे की, त्या ठिकाणी अर्थ निर्माण होतो आणि अर्थच माझ्याकरिता शब्द कधी निर्माण होईल याची वाट पाहत असतो. असे माऊलींच्या शब्दांचे सामर्थ्य आहे, असेही त्यांनी सांगितले. महोत्सवाला प्रवेश खुला असून कीर्तनांचा पुणेकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
