गिरीप्रेमी संस्थेतील ११ महिला गिर्यारोहकमेंटोक कांग्री मोहिमेसाठी पुण्यातून रवाना
– उषा काकडे यांच्या हस्ते ‘फ्लॅग ऑफ’; मोहिमेच्या यशस्वीतेसाठी दिल्या शुभेच्छा
गिर्यारोहक महिलांच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला सलाम
- उषा काकडे यांचे प्रतिपादन; ‘गिरीप्रेमी’च्या ११ महिला गिर्यारोहक मेंटोक कांग्री मोहिमेसाठी रवाना
पुणे, ता. १ : जगातील सर्वोच्च शिखरावरील यशस्वी मोहिमेनंतर आता पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ गिर्यारोहण संस्थेच्या केवळ महिला गिर्यारोहकांचा संघ लडाखमधील मेंटोक कांग्री (६,२५० मीटर) या हिमशिखराच्या मोहिमेसाठी रवाना झाला आहे. या १६ दिवसांच्या मोहिमेत १८ वर्षांच्या तरुणीपासून ते ५० वर्षांच्या पुढील महिलेपर्यंत एकूण ११ महिला सहभागी झाल्या असून, ज्येष्ठ गिर्यारोहक अंजली कात्रे (६०) यांचा सहभाग या मोहिमेचे विशेष आकर्षण ठरत आहे.
या मोहिमेला बुधवारी प्रसिद्ध उद्योजिका व ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या हस्ते भारताचा राष्ट्रध्वज देऊन शुभारंभ करण्यात आला. ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या संस्थापिका उषाप्रभा पागे, प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे, संस्थेचे सचिव मनोज कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी काकडे यांनी महिला गिर्यारोहकांच्या जिद्दीचे कौतुक करत, ‘अत्यंत कठीण परिस्थितीत सलग १६ दिवस चालण्याची तयारी आणि कोणतीही भीती न बाळगता हिमालयातील आव्हान स्वीकारण्याचा आत्मविश्वास या महिलांमध्ये दिसून येतो. त्यांच्या धैर्याला आणि चिकाटीला सलाम करते,” असे गौरवोद्गार काढले.
उषाप्रभा पागे, उमेश झिरपे, अविनाश फौजदार व आशिष माने यांच्या मार्गदर्शनाखाली व तन्वी चव्हाण (३८) यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेत सोनिया भावसार (२६), देवयानी वडनेरकर (४५), अंजली कात्रे (६०), शीतल मुकादम (४७), अनुष्का देव (२५), गायत्री दमामे (२१), चेतना शेटे (२९), साक्षी प्रभुणे (२२), शर्वरी परांजपे (२४), तनिष्का शिंदे (१८) या ११ महिला गिर्यारोहकांचा समावेश आहे.
तीन जुलैपासून सुरु होणाऱ्या या १६ दिवसीय या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तरुण मुलींसोबतच वयस्कर महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग आहे. या महिलांच्या अफाट ऊर्जेने प्रेरित होऊन उषा काकडे यांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. कठीण आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवणाऱ्या या सर्व महिलांचे मनोधैर्य वाढवत, उषा काकडे आणि त्यांच्या ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण संघाला या मोहिमेसाठी मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या.
उमेश झिरपे यांनी सांगितले, की या मोहिमेसाठी सहभागी महिलांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कठोर शारीरिक व मानसिक तयारी केली आहे. सह्याद्रीतील ट्रेक, दीर्घ पल्ल्याच्या पदभ्रमंती, तंदुरुस्तीचे प्रशिक्षण आणि हिमालयीन मोहिमेची विशेष तयारी करून हा संघ सज्ज झाला आहे.
लडाखमधील मेंटोक कांग्री हे सुमारे ६,२५० मीटर उंचीवरील आव्हानात्मक हिमशिखर असून, या मोहिमेत गिर्यारोहकांना प्रतिकूल हवामान, कमी प्राणवायू आणि दीर्घ पायी प्रवासाचा सामना करावा लागणार आहे. भारतीय तिरंगा आणि ‘गिरिप्रेमी’चा ध्वज शिखरावर फडकवून हा महिला संघ यशस्वीपणे परत येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
“अतिशय कठीण परिस्थितीतून मार्ग काढत, सलग १६ दिवस चालण्याची जिद्द बाळगून गिर्यारोहणासाठी सज्ज झालेल्या या महिला खरोखरच कौतुकास्पद आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती नसून एक वेगळाच आत्मविश्वास आणि जिद्द दिसून येत आहे. महिला सक्षमीकरणाचा हा आदर्श वस्तुपाठ असून, पुण्यासह संपूर्ण भारताला ही मोहीम प्रेरणा देईल.”
- उषा काकडे, प्रसिद्ध उद्योजिका आणि ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका
