September 20, 2026

दलित कला व साहित्य चळवळ अधिक बळकट झाली पाहिजे -डॉ सुखदेव थोरात

0
IMG-20260901-WA0048
Spread the love

‘उर्गेंन आर्ट फेस्टिव्हल’ चे उत्साहात उद्घाटन
पुणे : विशिष्ट समाजव्यवस्था आणि धार्मिकतेचा प्रचार करणाऱ्या कला आणि साहित्य त्यामुळे समाजामध्ये दुफळी निर्माण होते. पुण्याची ओळख ही अभिजात कलेसाठी आहे परंतु त्यामधून कधीही समानतेचा विचार मांडला जात नाही. समानतेचा विचार मांडून समाजामध्ये एकता, बंधुता निर्माण व्हावी यासाठी समानतेचा विचार मांडणाऱ्या दलीत साहित्य आणि कलेची समाजाला नितांत गरज असून त्यासाठी दलित कला आणि साहित्य चळवळ अधिक बळकट झाली पाहिजे असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ . सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.

करुणादीप फाउंडेशन आणि त्रिरत्न वैरोचना सेंटर यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या उर्गेंन आर्ट फेस्टिवल चे उद्घाटन डॉ. सुखदेव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते . ज्येष्ठ चित्रकार सवींद्र सावरकर, विचारवंत राजू परुळेकर, करुणादीप फाउंडेशनचे प्रमुख डॉ . जीवक व्ही . डी गायकवाड, डॉ .अस्मिता गायकवाड, माजी पोलिस महासंचालक चंद्रशेखर दैठणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ. सुखदेव थोरात म्हणाले , नाटक सिनेमा यांसह विविध परफॉर्मिंग आर्ट्स या समाजाचे प्रबोधन करून समता आणि विचार यांची भाषा बोलतात . त्यामधूनही समाज परिवर्तन घडू शकते. ब्राह्मणवादी विचार जाऊन समाजामध्ये समाजवादी आणि समतावादी विचार प्रस्थापित होत आहेत हीच एक प्रकारे परिवर्तनाची सुरुवात म्हटली पाहिजे या परिवर्तनाच्या चळवळीला आणखी बळकटी देण्यासाठी साहित्य कला यांच्यामार्फत दलितांचे दुःख समाज समोर मांडले जाणे गरजेचे आहे.

राजू परुळेकर म्हणाले, बौद्ध धर्माने कायम समतेचा आणि समानतेचा विचार मांडला . भारत देशामध्ये बौद्ध धर्म पूर्वीपासूनच अस्तित्वात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्याला पुनर्जन्म दिला. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार ज्या प्रमाणात व्हायला हवा होता त्या प्रमाणात भारत देशामध्ये झाला नाही. ती मात्र खंत आहे. बौद्ध धर्म जो समानतेचा विचार देतो त्या विचारांची आज समाजाला गरज आहे, त्यामुळेच विविध कला आणि साहित्याच्या माध्यमातून हा विचार लोकांसमोर मांडला गेला पाहिजे.

सवींद्र सावरकर म्हणाले, एक कलाकार म्हणून कोणाचाही प्रभाव तुझ्यावर पडू देऊ नकोस की माझ्या गुरूंनी मला शिकवण दिली आहे. गेल्या 40 वर्षांपासून मी या शिकवणीवर माझी वाटचाल करत आहे. बौद्ध धर्म आणि विज्ञान हे एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही हाच विचार मी माझ्या कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

डॉ. जीवक गायकवाड म्हणाले, बौद्ध धर्माचे शिकवण आणि विचार यांचा प्रचार आणि प्रसार या महोत्सवाच्या माध्यमातून होऊ शकेल . सध्याच्या काळामध्ये या विचारांची समाजाला नितांत गरज आहे हे ओळखूनच आम्ही कला आणि साहित्याच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा विचार कसा प्रकारे समाजामध्ये आणि विशेषतः तरुणांपर्यंत पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करीत आहोत.
बालगंधर्व रंगमंदिर येथे 3 सप्टेंबर पर्यंत उर्गेंन आर्ट फेस्टिवल सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये होणार आहे हा महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी