June 2, 2026

‘झेप’ उपक्रमाच्या चौथ्या वर्षाची प्रेरणादायी सुरुवात उत्साहात

0
IMG-20260602-WA0044
Spread the love
  • डॉ. नंदकुमार पालवे व सौ. आरती पालवे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ संस्थापित “सप्तसिंधू” महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित सन्मती बाल निकेतन आणि तिर्थरूप शैक्षणिक वसतिगृह यांच्या वतीने आयोजित ‘झेप’ या विशेष उपक्रमाची सुरुवात सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे सलग चौथे वर्ष असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव आणि प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या माध्यमातून सातत्याने केले जात आहे.

यावर्षीच्या ‘झेप’ उपक्रमाच्या उद्घाटन सत्रासाठी सेवासंकल्प प्रतिष्ठान, बुलढाणा येथील डॉ. नंदकुमार पालवे आणि सौ. आरती पालवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “भवताल समजून घेताना” या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. पालवे यांनी पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या स्मृतींना अभिवादन करताना, माई म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ असल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यामुळे हजारो निराधार, अनाथ आणि वंचित मुलांच्या आयुष्याला दिशा मिळाली असून, माईंच्या कार्यभूमीत येऊन त्यांच्या लेकरांसमोर संवाद साधण्याची संधी मिळणे हा स्वतःसाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मानसिक आरोग्य आणि भावनिक संतुलन या विषयावर बोलताना डॉ. पालवे यांनी प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी सच्चा मित्र असणे किती आवश्यक आहे, यावर भर दिला. “तुमच्याकडे किती मित्र आहेत यापेक्षा एक तरी सच्चा मित्र आहे का, हे अधिक महत्त्वाचे आहे,” असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आणि दुःख वाटून घेण्यासाठी विश्वासू व्यक्ती असणे ही मानसिक स्वास्थ्याची मूलभूत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सौ. आरती पालवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कृतज्ञतेचे महत्त्व अधोरेखित केले. “थँक्यू” आणि “सॉरी” हे दोन साधे शब्द नात्यांमध्ये सकारात्मकता निर्माण करतात, असे सांगत त्यांनी आपल्या आयुष्यासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञ राहण्याचा संदेश दिला. कृतज्ञता ही व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारी आणि जीवन अधिक सुंदर बनविणारी भावना असल्याचे त्यांनी नमूद केले.

दोन्ही मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थी अत्यंत एकाग्रतेने आणि उत्सुकतेने ऐकत होते. त्यांच्या संवादातून विद्यार्थ्यांना संवेदनशीलता, सकारात्मकता, मैत्री, कृतज्ञता आणि मानसिक आरोग्य यांचे महत्त्व नव्याने समजले.

या प्रसंगी द मदर ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. विनयदादा सपकाळ यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ यांनी केले. ‘झेप’ या उपक्रमामागील संकल्पना तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी या उपक्रमाचे महत्त्व त्यांनी उपस्थितांसमोर विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मा शिंदे यांनी केले, तर काशिनाथ सर यांनी आभार प्रदर्शन केले.

‘झेप’च्या चौथ्या वर्षाच्या प्रारंभामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी प्रेरणा, नवा विचार आणि नव्या उंचीची झेप घेण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी