वेळेत बिल भरूनही महावितरणचा सावळा गोंधळ; स्मार्ट मीटर योजनेंतर्गत ग्राहकांची आर्थिक लूट – प्रशांत कांबळे
वेळेत व नियमित वीज बिल भरूनही सर्वसामान्य नागरिकांना वाढीव व अन्यायकारक बिलांचा सामना करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. भारत सरकारच्या स्मार्ट मीटर योजनेमुळे ग्राहकांना सुविधा मिळण्याऐवजी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप त्रस्त ग्राहक व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केला आहे.
प्रशांत कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे दरमहा येणारे नियमित वीज बिल साधारणपणे 600 ते 800 रुपयांच्या दरम्यान असताना यावेळी अचानक जवळपास 1900 रुपयांचे बिल आल्याने त्यांनी महावितरणकडे तक्रार नोंदवली होती. तक्रार केल्यानंतर बिल कमी करून येईल असे संबंधितांकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात बिल कमी न करता वाढीव रक्कम भरावीच लागेल, असे सांगण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याबाबत बोलताना प्रशांत कांबळे म्हणाले की, “सर्वसामान्य नागरिकांनी एवढी मनमानी सहन करायची किती दिवस? तीनपट वाढलेले बिल नागरिकांनी भरायचे कसे? स्मार्ट मीटर योजना ग्राहकांच्या हितासाठी नसून नागरिकांना आर्थिकदृष्ट्या लुबाडण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.”
तसेच आता महावितरणकडून कर्मचारी प्रत्यक्ष मीटर कट करण्यासाठी येणार नसून, एक महिन्याचे बिल थकल्यास वीजपुरवठा आपोआप बंद होणार असल्याची माहितीही देण्यात येत आहे. विशेष म्हणजे बिल भरल्याशिवाय कोणतीही तक्रार नोंदवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका घेतली जात असल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“सर्वसामान्य नागरिकांनी आता न्याय मागायचा तरी कोणाकडे? आम्ही नगरसेवक, आमदार, खासदार निवडून देतो ते नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी. मात्र सध्याचे अनेक लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांपासून दूर जात स्वतःच्या स्वार्थात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे. देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे की काय, अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे,” अशा भावना त्रस्त नागरिक प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केल्या.
महावितरण प्रशासनाने वाढीव बिलांबाबत तात्काळ स्पष्टता द्यावी, स्मार्ट मीटर योजनेंतर्गत होत असलेल्या तक्रारींची चौकशी करावी व सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
