February 15, 2026

त्रिधारा : सांगीतिक संगमाची सुरेल सायंकाळ

0
IMG-20250618-WA0034
Spread the love

पुणे : भावगीत, भक्तीगीत, लोकगीत, लावणी, गौळण, कोळीगीत, बालगीत अशा अनेक प्रकारच्या गीतांनी ‘त्रिधारा’ या सांगीतिक कार्यक्रमाने रसिकांची सायंकाळी संस्मरणीय ठरली.
निमित्त होते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित शांता शेळके, पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे यांच्या स्मृतींना अभिवादन करणारा ‘त्रिधारा’ या अनोख्या सांगीतिक कार्यक्रमाचे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत भरभरून प्रतिसाद दिला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मंगळवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सन्मिता धापटे-शिंदे, श्रुती देवस्थळी आणि राहुल जोशी यांनी लोकप्रिय गीते सादर केली तर राजू जावळकर (तबला), प्रसन्न बाम (संवादिनी), अभय ओक (बासरी), उद्धव कुंभार (तालवाद्य), अमन सय्यद (सिंथेसायझर) यांनी साथसंगत केली.
माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, वासंती जाधव, हर्षाली माथवड, नवनाथ जाधव, मधुरा वैशंपायन यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्यजीत धांडेकर आणि समीर हंपी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
प्र. के. अत्रे यांच्या ‘देह देवाचे मंदिर’ या रचनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पुलंच्या संगीताने नटलेल्या आणि माणिक वर्मा यांनी अजरामर केलेल्या गदिमा लिखित ‘कौसल्येचा राम’ हे भक्तीगीत सादर करण्यात आले.
राजा बढे यांनी शब्दबद्ध तर पुलंनी संगीतबद्ध केलेले ‘हसले मनी चांदणे’ हे भावगीत रसिकांना भावले पुल, अत्रे आणि शांताबाईंच्या अनेक आठवणींना उजाळा देत स्नेहल दामले यांनी अभ्यासपूर्ण निवेदन केले. संकल्पना, काव्यवाचन आणि अभिवाचन प्रथमेश इनामदार यांचे होते. कार्यक्रमाची सांगता रसिक आणि कलाकार यांच्यातल्या नात्याला समृद्ध करणाऱ्या, पुलंनी संगीतबद्ध केलेल्या ‘माझे जीवन गाणे’ या गाण्याने झाली. रसिकांनी या कार्यक्रमास भरभरून दात देत आनंद लुटला.
मराठी साहित्य आणि संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शांता शेळके, प्र. के. अत्रे आणि पु. ल. देशपांडे या तीनही दिग्गज साहित्यिकांची जन्मतिथी जून महिन्यात असते. या निमित्ताने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
साहित्य, कला आणि अभिनयाचे रोपटे इथे वाढले आहे. कित्येक कलाकारांचा सहवास, कौतुक, रसिकांची दाद या सभागृहाने अनुभवली आहे. आम्हाला अनेक गोष्टी येथे शिकायला मिळाल्या असल्याने या नाट्यगृहाचे आम्ही देणे लागतो या भावनेतूनच रौप्य महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, असे आयोजक सत्यजीत धांडेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
माजी नगरसेविका मोनिका मोहोळ यांनी सत्यजीत धांडेकर यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय जगताप, गणेश भोसले, धनंजय पुरकर, केदार भालशंकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रत्ना दहिवेलकर यांनी सूत्रसंचालन तर अनुराधा हाटकर यांनी आभार मानले.

फोटो : ‘त्रिधारा’ कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर.
फोटो : ‘त्रिधारा’ कार्यक्रम सादर करताना कलाकार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी