गोपनीय माहितीच्या सुरक्षिततेचे भविष्यामध्ये सायबर क्षेत्रापुढे आव्हान सायबर क्षेत्रातील तज्ञांचे मत
‘इन्व्हेस्टीगेशन मास्टरक्लास’दिवस दुसरा
ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीज, डीओटी -एसएसपीयू यांचा संयुक्त उपक्रम; पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रीय तपास प्रशिक्षण कार्यक्रम.
पुणे : बदलत्या काळानुसार सायबर क्षेत्रातील हल्ल्यांचे आणि गुन्हेगारीचे प्रकार बदलत आहेत. आता केवळ आर्थिक लाभासाठीच नव्हे तर गोपनीय माहितीची चोरी करण्यासाठी ही मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले होतात. यामध्ये वैयक्तिक माहिती पासून ते देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा माहितीची चोरी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गोपनीय माहितीच्या सुरक्षिततेचे भविष्यामध्ये सायबर क्षेत्रापुढे मोठे आव्हान आहे असे मत सायबर क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली.
ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीज, तंत्रज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने पुनीत बालन ग्रुप च्या सहकार्याने पुणे विद्यापीठाच्या जिऑलॉजी विभागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘इन्व्हेस्टीगेशन मास्टरक्लास’ सायबर सुरक्षा संदर्भातील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी सायबर क्षेत्रातील तज्ञांनी भविष्यामध्ये गोपनीय माहितीचे संरक्षण कशाप्रकारे करता येणे शक्य आहे या संदर्भात प्रशिक्षण दिले. ज्येष्ठ सायबर तज्ज्ञ अमलेश मेंढेकर, कुणाल पाटील यांनी मार्गदर्शन केले . ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीज चे प्रमुख केतन अत्रे यावेळी उपस्थित होते.
अमलेश मेंढेकर म्हणाले, ज्याप्रमाणे वैयक्तिक वापरापासून ते देशाच्या संरक्षण क्षेत्रापर्यंत मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे , त्याच प्रमाणे सायबर हल्ल्यांचे प्रमाणही वाढत आहे. सध्या जगामध्ये प्रत्येक 39 सेकंदा नंतर यशस्वी सायबर हल्ला होत आहे . तसेच पाच लाख साठ हजार मालवेअर सॉफ्टवेअर तयार होऊन सायबर हल्ले तयार केले जात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ल्यांचे व्यापकता वाढली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यांना सामोरे जाण्यासाठी पारंपारिक पद्धत पुरेशी पडणार नाही, सायबर हल्ले रोखण्यासाठी आणि त्यांचा तपास करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर वाढणेही तितकेच गरजेचे आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला कमांड देण्यासाठी पूर्वी कोडींग चा अभ्यास असणे गरजेचे होते परंतु सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत रोजच्या वापरण्याच्या भाषेमध्येही संवाद साधता येणे शक्य आहे त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाणही वाढत असून त्यांची क्लिष्टताही वाढत आहे अशावेळी हे गुन्हे सोडविण्यासाठी अधिकाधिक तंत्रज्ञानाची माहिती आणि प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे असेही अमलेश मेंढेकर यांनी यावेळी सांगितले.
कुणाल पाटील म्हणाले, आज तपास यंत्रणांच्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आहे, तसेच गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षण आणि साधनांची कमी आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास करताना हा मोठा अडथळा असून सायबर गुन्हेगारी विषयक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आधुनिक प्रशिक्षण कायम होत राहणे गरजेचे आहे.
सायबर क्षेत्रामध्ये गुन्हेगार आणि तपास यंत्रणा यांच्यामध्ये मोठी तफावत दिसून येते. जेव्हा सायबर गुन्हा उघडकीस येतो त्यापूर्वी किमान सहा महिने ते एक वर्ष गुन्हेगाराने त्या संदर्भात काम सुरू केलेले असते. जेव्हा गुन्हा उघडकीस येतो त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानही बदललेले असते, असेही कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले.
रोहन बनकर यांनी सोशल मीडिया आणि सायबर क्राईम तपास, कर्नल संभव खुगशाल यांनी माहिती तंत्रज्ञान आणि जीआरसी तसेच कुलदीप सोनार यांनी इन्वेस्टीगेटिंग डार्क वेब आणि पॅटरीसिया शिफुनेस यांनी सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन या संदर्भात कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले.
