नियोजनपूर्वक ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणे आवश्यक: प्रा. डॉ. पराग काळकर
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
पुणे प्रतिनिधी
सध्याच्या काळात केवळ परीक्षेमध्ये मिळालेले गुण पुरेसे ठरत नाहीत तर प्रत्येकाने नियोजनपूर्वक ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. ज्ञान आणि कौशल्य आत्मसात केल्यास जगात काहीही साध्य करता येते, याची जाणीव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र -कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. काळकर यांच्यासह आमदार सिद्धार्थ शिरोळे, आयोजक व पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, रिपब्लिकन पक्ष शहराध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना छाजेड, नगरसेविका भक्ति गायकवाड, रिपब्लिकन पक्ष शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम, दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक किरण लोखंडे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. काळकर म्हणाले, पुण्यात जन्माला येणे किंवा शिक्षणाची संधी मिळणे हे विद्यार्थ्यांसाठी भाग्याचे आहे. पुणे शहराला शिक्षणाची शेकडो वर्षाची परंपरा आहे. पुण्यात 35 हून अधिक विद्यापीठे असून शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. विविध शासकीय योजना आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक संस्था यामुळे शिक्षण प्राप्त करणे सुलभ झाले आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, असे काळकर यांनी नमूद केले. कोणाचीही नक्कल न करता स्वतः कष्ट घेऊन आपल्या कारकिर्दीचे नियोजन करावे. त्या दृष्टीने आपल्याला कोणत्या क्षेत्रात ज्ञान प्राप्त करायचे आहे, कोणती कौशल्य आत्मसात करायची आहेत, याची पुढील पाच वर्षांची रूपरेषा निश्चित करावी, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
भाषा, भाषण आणि संभाषण हे गुण अंगी असणेही यश प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या क्षेत्रातील सखोल ज्ञान घेण्याबरोबरच अधिकाधिक वाचनाने इतर क्षेत्रातील माहिती देखील करून घेतली पाहिजे. तसेच माणूस समजावून घेऊन समूहात काम करण्याची तयारी हवी. समस्या सोडवण्याची मानसिकता हवी. आयुष्यात अनेकदा नवनवे प्रश्न उभे राहतात. ते सोडवण्याची क्षमता हवी, असे मार्गदर्शन काळकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विचारांमध्ये सुस्पष्टता असणे आवश्यक असल्याचे मत आमदार शिरोळे यांनी व्यक्त केले. अनावश्यक चर्चा करून वेळ घालवण्यापेक्षा भविष्याचा वेध घेणे आवश्यक आहे. औपचारिक शिक्षणाप्रमाणेच छंदांची जोपासनाही केली पाहिजे. अनेकदा छंदांच्या जोपासणेतून यशस्वी कारकीर्द घडवल्याचीही अनेक उदाहरणे दिसून येतात, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. औंध बोपोडी परिसरातील सर्व नगरसेवक आणि आपण 25 विकास कामांचे उद्दिष्ट निश्चित केले असून पुढील पाच वर्षात या परिसराचा चेहरा मोहरा बदलून टाकू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
जीवनात शिक्षणाचे महत्त्व निर्विवाद असून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक वर्षापासून त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम आयोजित करत असल्याचे परशुराम वाडेकर यांनी सांगितले. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न यांनी निश्चितपणे यश प्राप्त करता येते. सध्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. शासनाकडून आणि सामाजिक संस्थांकडून अनेक योजना आणि सुविधा उपलब्ध होत आहेत. त्याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी उज्वल भवितव्य घडवावे, अशी अपेक्षा वाडेकर यांनी व्यक्त केली. आपल्या उपमहापौर पदाचा उपयोग शिक्षणाच्या विकासासाठी करणार आहोत. आपल्या सहा महिन्याच्या कार्यकाळातील कामाचा लेखाजोखा कार्यकर्ते, मतदार आणि नागरिकांसमोर मांडणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲड . ज्ञानेश्वर जाविर यांनी केले तर आभार सुनीता वाडेका यांनी मानले.
