June 12, 2026

-प्रा. संगीता मावळे यांना ‘कीर्तन महर्षी’ पुरस्कार प्रदान

0
IMG-20260611-WA0023
Spread the love

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस च्या भागवत सप्ताह महोत्सवात गौरव

पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे संस्थेच्या नर्‍हे येथील शैक्षणिक संकुलात आयोजित भागवत सप्ताह महोत्सवानिमित्त प्रख्यात कीर्तनकार प्रा. संगीता मावळे यांना ‘कीर्तन महर्षी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ह.भ.प.राजेंद्र महाराज येप्रे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, नगरसेवक युवराज बेलदरे-पाटील, नगरसेवक सचिन मोरे, फुलचंद चाटे, माजी सभापती प्रभावती भूमकर, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, राजू प्रभाकर कुटे, फुंदे सर, स्वप्नील कुटे, महेंद्र भोसले, अशोक जाधवर उपस्थित होते.

याच कार्यक्रमात भागवताचार्य श्रद्धेय स्वामी पंढरीनाथ महाराज शास्त्री, मृदुंगाचार्य स्वप्नील निवंगुणे महाराज, गायनाचार्य प्रकाश अण्णा गायकवाड, गायनाचार्य राम यादव, संदीप महाराज शिरसाट, बबन महाराज वंजराटकर, भरत महाराज खाडे, विद्यार्थी अल्वेश पटेल यांचा सन्मान करण्यात आला.

राजेंद्र महाराज येप्रे म्हणाले, भविष्यात जगासमोर विविध आव्हाने उभी राहू शकतात. त्यामुळे अन्न, इंधन आणि इतर सर्व संसाधनांच्या वापरात काटकसरीची सवय अंगीकारणे गरजेचे आहे. दैनंदिन कामे करतानाही भगवंताचे नामस्मरण आणि चिंतन केले, तर मनामध्ये सात्त्विकता निर्माण होते. भाजी निवडताना मालिका पाहण्यापेक्षा भगवंताचे स्मरण केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम मनावर आणि आचार-विचारांवर होतो.

प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, मुलांमध्ये चांगल्या विचारांची आवड निर्माण व्हावी, हा अशा उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे. चांगले विचार त्यांच्या कानावर पडले, तर त्यातून त्यांचे जीवन समृद्ध होऊ शकते. भारतीय संस्कार आणि संस्कृतीची जपणूक करणे आज काळाची गरज आहे. आजची पिढी विविध आव्हानांना सामोरी जात आहे. परीक्षेतील अपयश किंवा निकालाच्या भीतीमुळे काही विद्यार्थी टोकाची पावले उचलतात, ही चिंतेची बाब आहे. अपयश आल्यास त्यावर मात करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे; आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा मार्ग असू शकत नाही.

ते पुढे म्हणाले, प्रत्येक प्राण्याला त्याचा जीवनक्रम नैसर्गिकरीत्या माहीत असतो; मात्र माणसाला संस्कार आणि शिक्षणाद्वारे घडवावे लागते. त्यामुळे योग्य मूल्यांचे शिक्षण देणे आवश्यक असून, त्यासाठी विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी