जय गणेश पालकत्व योजना म्हणजे आदर्श व्यक्ती घडविणारी शाळाश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांची सद्भावना : जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे चालविली जाणारी विद्यार्थ्यांसाठीची जय गणेश पालकत्व योजना ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगाची आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक मदतच होत नाही तर त्यांना त्यांचे आयुष्य घडविण्यासाठी दिशादर्शक ठरते. ही योजना म्हणजे एक प्रकारे आदर्श व्यक्ती घडविणारी शाळाच असल्याचे मत या योजनेतून शिक्षण घेतलेल्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत दहावी आणि बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ आणि साहित्य वाटप कार्यक्रम लेडी रमाबाई हॉल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला एमकेसीएल च्या कार्पोरेट व्यवस्थापन चे उदय पंचपोर, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने , कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ.अ. ल. देशमुख, विजय भालेराव, सचिन आखाडे, विलास रासकर, राजाभाऊ पायमोडे, तुषार रायकर, विशाल केदारी, विश्वास पलुसकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जय गणेश पालकत्व योजनेअंतर्गत शिक्षण घेतलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी या विद्यार्थ्यांनी या योजनेचे महत्त्व देखील स्पष्ट केले. योजनेतील माजी विद्यार्थिनी सीए गौरी खटावकर , फार्मासिस्ट अनिरुद्ध दोरगे आणि बी टेक झालेला सिद्धार्थ दहिभाते या योजनेतील माजी विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
अनिरुद्ध दोरगे म्हणाला, इयत्ता दुसरी मध्ये असताना मी या योजनेअंतर्गत सहभागी झालो. या ट्रस्टने केवळ माझ्यातील विद्यार्थी घडविला नाही, तर मला एक चांगले व्यक्ती म्हणून घडण्यास मदत केली. त्यामुळे या ट्रस्टचा मी आयुष्यभर ऋणी राहील, असेही त्याने सांगितले. गौरी खटावकर म्हणाली, ट्रस्ट तर्फे राबविण्यात आलेल्या योजनेमुळे मला केवळ शैक्षणिक आधार मिळाला नाही तर भावनिक आधारही मिळाला. ट्रस्ट हा एक प्रकारे कुटुंब म्हणून काम करतो. मी सीए झाले त्यामध्ये महत्त्वाचा वाटा ट्रस्टचा आहे. ट्रस्टने जर माझ्यावर विश्वास दाखवला नसता तर मी सीए झाले नसते . मी ज्या प्रकारे सीए झाले त्याचप्रमाणे माझ्या हातूनही एखादा सीए घडावा हे माझे स्वप्न आहे.
सिद्धार्थ दहिभाते म्हणाला, मी जे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नांना बळ देण्याचे काम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने केले. हा केवळ एक ट्रस्ट नव्हे तो एक कल्पवृक्ष आहे, जो गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना आपल्या छायेमध्ये घेऊन त्यांना आधार देतो. हा आधार त्यांना आयुष्य घडविण्यासाठी मदत करतो आणि त्यांच्यामध्ये एक चांगला माणूस घडविण्यासाठी जी कौशल्य आवश्यक असतात ती कौशल्य त्यांना देतो त्यामुळे तो माणूस एक आदर्श व्यक्ती म्हणून घडू शकतो.
उदय पंचपोर म्हणाले, दहावी आणि बारावीतील शिक्षण तसेच त्यामध्ये मिळणारे गुण हा विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक आयुष्यातील एक टप्पा आहे. त्यानंतर खऱ्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर माणूस गुणात्मकरित्या किती चांगला आहे, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने राबविलेल्या जय गणेश पालकत्व योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत.
सागर ढोले पाटील म्हणाले, जय गणेश पालकत्व योजनेतून आपल्याला शिक्षण मिळाले आहे आणि आपण या शिक्षणाचा उपयोग आपले कुटुंब आणि आयुष्य घडविण्यासाठी केला आहे, ही जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवली पाहिजे. तो कृतज्ञ भाव मनामध्ये ठेवून आयुष्य जगले तर तुम्ही केवळ तुमच्या शैक्षणिक आयुष्यातच यशस्वी होणार नाही तर एक संस्कारक्षम आणि आदर्श व्यक्ती म्हणूनही यशस्वी होऊ शकता.
प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी म्हणाले, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्यामध्ये आदर्श व्यक्तिमत्व कसे घडविता येईल, त्यांना आयुष्य जगताना जे गुण आवश्यक आहेत ते गुण कसे या योजनेअंतर्गत देता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
डॉ.अ. ल. देशमुख म्हणाले , महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांनी जीवन शिक्षण मूल्य सांगितले आहेत. ते जीवन शिक्षण हा पालकत्व योजनेचा गाभा आहे. या योजनेअंतर्गत शिक्षण घेतलेला विद्यार्थी हा शैक्षणिक दृष्ट्या यशस्वी होतोच. परंतु आपल्या वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी होऊ शकतो, कारण त्या प्रकारे आम्ही त्यांना संस्कार देत असतो, असेही त्यांनी .सांगितले.
