‘ अंतर्नाद’च्या प्रयोगाने रंगभूमीवर उभा केला भक्तिरसाचा जिवंत वारीसोहळा
पुणे : भाऊसाहेब भोईर यांच्या ‘मोरया थिएटर्स’ निर्मित ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ या संगीत नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाने प्रेक्षकांना प्रत्यक्ष वारीचा अनुभव दिला. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात झालेल्या या प्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विठ्ठल भक्ती, अध्यात्म, विज्ञान आणि आधुनिक विचार यांचा सुरेख संगम या नाटकातून अनुभवायला मिळाला.
नाटक सुरू होण्यापूर्वीच नाट्यगृह परिसर हरिनामाच्या गजराने आणि अभंगांनी भक्तिमय झाला होता. प्रवेशद्वारावर संजावटीतून करून वारीचे वातावरण साकारण्यात आले होते. नाट्यगृहात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक रसिकाच्या कपाळी चंदनाचा टिळा लावून त्यांचे स्वागत करण्यात येत होते. विविध क्षेत्रांतील मान्यवर, वारकरी संप्रदायातील मंडळी, कला रसिक आणि युवा प्रेक्षकांनी नाट्यगृह खचाखच भरले होते. तिसरी घंटा झाल्यानंतर ‘सांगा विठ्ठल माझा मला पावलं का?’ या अभंगाने नाटकाची सुरुवात होताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
लेखक विनोद रत्ना यांनी आधुनिक विचारांचा युवक ‘डीके’ अर्थात ज्ञानेश्वर कदम आणि त्याच्या अध्यात्माकडे होणाऱ्या प्रवासाची कथा प्रभावीपणे उभी केली आहे. सुरुवातीला वारीकडे अंधश्रद्धा म्हणून पाहणारा डीके विविध वारकऱ्यांच्या सहवासातून आत्मिक परिवर्तन अनुभवतो. “तुमच्या रक्तात पण वारी आहे,” हा संवाद नाटकाचा गाभा स्पष्ट करून जातो. विज्ञान आणि अध्यात्म यांचा संघर्ष आणि समन्वय संवादातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
दिग्दर्शक मनोज डाळिंबकर आणि सहायक दिग्दर्शक आकाश थिटे यांच्या कल्पक दिग्दर्शनामुळे नाटक अधिक प्रभावी ठरले. प्रकाशयोजना, ध्वनी, पारंपरिक वेशभूषा, नृत्यरचना आणि जिवंत नेपथ्यामुळे आळंदी, जेजुरी, दिंडी, पालखी आणि चंद्रभागेचा प्रवास रंगमंचावर साकारण्यात आला. प्रेक्षकांमधून निघणारी दिंडी, रिंगणातील घोडा आणि संतांची गळाभेट हे प्रसंग विशेष दाद मिळवून गेले.
नाटकातील संगीत हे या प्रयोगाचे मोठे वैशिष्ट्य ठरले. अभंग, पोवाडा, गोंधळ आणि आधुनिक रॅप शैलीचा अनोखा संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. निरंजन पेडगावकर यांच्या संगीतबद्ध चालींना गायक-वादकांनी समर्थ साथ दिली. ‘विठ्ठल विठ्ठल’चा गजर, ‘मल्हारी माझा राजा’चा जल्लोष आणि दिंडीवरील पदांनी वातावरण भारून गेले.
प्रमुख भूमिकेत प्रणव सपकाळे यांनी डीकेच्या मनातील संभ्रम, तर्क आणि अध्यात्मिक परिवर्तन प्रभावीपणे साकारले. मनोज डाळिंबकर यांच्या ‘जाधव साहेब’ भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. मानसी कुलकर्णी यांच्या वृद्ध आजीच्या भूमिकेने अनेकांना भावूक केले. “जगणं आणि मरण यांच्या मधली जी पायवाट आहे ना, ती वारी आहे,” हा संवाद सभागृहात शांतता पसरवून गेला.
प्रयोगानंतर अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू होते. काही जण अभंग गुणगुणत बाहेर पडत होते, तर काहींनी प्रत्यक्ष पंढरपूर वारी करण्याची इच्छा व्यक्त केली. “हे नाटक नाही, ही प्रत्यक्ष वारी आहे,” अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ रसिकाने व्यक्त केली.
