नेमेचि येतो मग पावसाळा – मग खडकवासल्यातून विसर्ग – मग नदीकाठी बचावकार्य – तात्पुरते स्थलांतर – मग राजकारण्यांकडून समाजसेवा / मदतकार्य.कायमस्वरूपी उपाययोजना कधी ?
2) नाल्यांचा नैसर्गिक प्रवाहात अडथळे ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाई करणेबाबत…
अपेक्षेप्रमाणे जोरदार पावसानंतर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग झाला, नदीकाठच्या सोसायट्या, वस्त्यांमध्ये पाणी शिरले आणि सोशल मीडियावर रील आणि फोटोंचा महापूर आला !!
मनपा ने बचावकार्य सुरू केले, कुठे नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला, कुठे घरं खाली केली, कुठे बाधितांचे शाळांमध्ये स्थलांतर करण्यात आले,
असा पूर आला की अनेक राजकीय व्यक्ती समाजकार्य करण्यात व्यग्र होतात …. भांडी, कपडे, चादरी, गाद्या व विविध संसारोपयोगी साहित्याचे वाटप, भोजन व्यवस्था हे सगळेच करतात आणि गेली अनेक वर्षे नित्यनेमाने सुरू आहे.
कवी विंदा करंदीकर म्हणतात त्याप्रमाणे –
गोड गोड् जुन्या थापा,
तुम्ही पेरा, तुम्ही कापा;
जुन्या आशा, नवा चंग,
जुनी स्वप्ने,नवा भंग;
तुम्ही तरी करणार काय् ?
आम्ही तरी करणार काय् ?
त्याच् त्याच खड्ड्यामध्ये,
पुन्हा पुन्हा तोच् पाय;
जुना माल्, नवे शिक्के,
सब् घोडे बारा ट्क्के !
माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला प्रश्न पडतो की प्रथे परंपरे प्रमाणे वर्षानुवर्षे हेच घडतंय, मग ह्याची मुळाशी प्रशासन कां जात नाही ?
दर वर्षी विसर्गानंतर त्रस्त होणाऱ्या पूरग्रस्तांचे अन्यत्र पुनर्वसन कां केले जात नाही ? किंवा जे अनधिकृतपणे वसलेले आहेत त्यांच्यावर कारवाई कां केली जात नाही ? ह्यात कोणाचा राजकीय दबाव आहे की प्रशासनाची बेपरवाई की कोणाचे अर्थपूर्ण संबंध ?
तसेच शहराच्या अनेक भागात धनदांडग्यानी नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे ठरतील अश्या पद्धतीने बांधकाम केल्याचे निदर्शनास येत आहे. ह्या पावसात अनेक ठिकाणी भिंती पडण्याच्या घटना घडत आहेत. अश्या सर्व बांधकामांवर निडरपणे कारवाई करण्याची गरज आहे.
महोदय आपण कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जाता, आता ह्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा व पुढील पावसाळ्यात तरी एकही घर पूररेषेत राहणार नाही यासाठी आवश्यक कारवाई करावी.
मी आपणास आश्वस्त करतो की अश्या प्रकारच्या कारवाईत आडवे येणाऱ्यांची नावं आपण जाहीर करा, पुणेकर आपल्या पाठीशी उभे राहतील.
प्रयत्न तर करून बघावा अशी आग्रही मागणी करत आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष,
क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995.
