-‘शिवरायांचा महाराष्ट्र ; अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र’ मोहीमअमित गायकवाड यांच्या संकल्पनेतून शिवजयंती महोत्सव समितीच्या राज्यव्यापी मोहिमेचा प्रारंभ ; बोधचिन्हाचे अनावरण
पुणे : शिवराज्याभिषेक दिन… शिवस्वराज्य दिन… भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. दुर्दैवाने सुराज्याचा उगम ज्या महाराष्ट्रात झाला तेथेच तरुणाई ही अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकत चालली आहे. महाराष्ट्रातील जबाबदार नागरिक म्हणून आपण या सर्वांविरोधात उभे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे ‘शिवरायांचा महाराष्ट्र ; अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र’ या राज्यव्यापी मोहीमेला नुकताच प्रारंभ झाला.
शिवजयंती महोत्सव समिती, पुणेचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या संकल्पनेतून ‘शिवरायांचा महाराष्ट्र ; अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र’ या राज्यव्यापी मोहीमीची सुरुवात शिवराज्याभिषेक दिनाचे, महाराष्ट्र शासन मान्य शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून करण्यात आली.
यावेळी ‘शिवरायांचा महाराष्ट्र ; अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र’ या बोधचिन्हाचे अनावरण अमित गायकवाड, डॅा. महादेव जाधव, ईशान गायकवाड, यश कंक, विराज कंक यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुण्यातील अनेक महाविद्यालयातील व विद्यालयातील तरुणाई उपस्थित होती.
कार्यक्रमाचे आयोजन सोहळयाचे प्रवर्तक अमित गायकवाड, रवींद्र कंक, शंकर कडू, प्रवीण गायकवाड, मोहन पासलकर, किरण शितोळे, महेंद्र भोईटे, विशाल गव्हाणे, निलेश जगताप यांसह असंख्य स्वराजबांधवांनी केले आहे.
अमित गायकवाड म्हणाले, पुण्यात सुरु झालेली ही मोहिम भविष्यात केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता देशपातळीवर नेणार आहोत. आम्ही आखलेल्या प्रभावी जनजागृतीचे या अंमली पदार्थाच्या विळख्यातून तरुणाई मुक्त करण्यास मदत होईल, याचा आम्हाला विश्वास आहे. शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळी मध्ये रिता करुन रयतेची झोळी सुख समृद्धी, स्वातंत्र्य, समानतेने भरली. या देशाला सुराज्य दिले होते.
