गाय वाचली तर भारतीय संस्कृती टिकेलपू. साध्वी कपिला दीदी गोपाल सरस्वती यांचे मत : श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्यावतीने प.पू. श्री गंगाधर स्वामी यांच्या १९ व्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताह सांगता
पुणे : एकीकडे गोमातेला विश्वमाता संबोधले जाते. महाराष्ट्रात गौमातेला राज्यमातेचा दर्जा प्राप्त झाला आहे; मात्र, आजही येथील कत्तलखाने बंद झालेले नाहीत तसेच गाईंची तस्करीही अद्याप थांबलेली नाही. त्यामुळे गायींच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे. गाय वाचली तर भारतीय संस्कृती टिकेल, असे मत पू. साध्वी कपिला दीदी गोपाल सरस्वती यांनी व्यक्त केले.
श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्यावतीने प.पू. श्री गंगाधर स्वामी यांच्या १९ व्या समाधी सोहळ्यानिमित्त देशी गायींच्या प्रजातींबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यात प्रथमच गौ-कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हा सप्ताह वर्धमान सभागृह, गंगाधाम चौक येथे संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास देशमुख महाराज, संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा बालेघाटे, विश्वस्त नरहर शिदोरे, वेदमुर्ती मंदार खळदकर, भोला वांजळे, डॉ. प्रसाद खंडागळे आदी उपस्थित होते.
पू. साध्वी कपिला दीदी गोपाल सरस्वती पुढे म्हणाल्या की, आज मंदिरांमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र गोशाळेत जाऊन दहा रुपयांचा चारा देण्यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नाही. नातेवाईकांसाठी आई-वडिलांच्या नावाने अनेक शिबिरांचे आयोजन केले जाते; परंतु गायींसाठी शिबीर सुरू करणारा एखादाही व्यक्ती दिसत नाही. भारतीय संस्कृतीचा कणा म्हणजे गोमाता असून तिच्या संरक्षणासाठी, जनजागृतीसाठी व प्रचारासाठी सर्वांनी एकत्र येणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. सप्ताहानंतर पानशेत येथील जिवाशी गावात प.पू. गंगाधर स्वामी शिरकाई देवी दर्शन पालखी सोहळा देखील उत्साहात संपन्न झाला.
