रमाई महोत्सव समतेचे प्रतीक : डॉ. श्रीपाल सबनीसमहामाता रमाई महोत्सवाला सुरुवात : उषा कोतले, शैलेंद्र मोरे यांचा रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्काराने गौरव
पुणे : महामाता रमाई या सात्विक स्त्रित्वाच्या त्यागाचे प्रतीक आहेत. कलुषित राजकारणामुळे समाज दुभंगला जात असताना रमाई महोत्सव खऱ्या अर्थाने समतेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामाता रमाई महोत्सवाचे उद्घाटन आज (दि. २) डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महोत्सव महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर येथे दि. २ ते दि. ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
उद्घाटन समारंभात सामाजिक कार्यकर्त्या उषा कोतले आणि रिपब्लिकन जनशक्ती प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांचा रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, संयोजक विठ्ठल गायकवाड, स्वागताध्यक्ष लता राजगुरू, महापालिकेचे माजी सहआयुक्त ज्ञानेश्र्वर मोळक उपस्थित होते. शाल आणि संविधानाची प्रत देऊन गौरव करण्यात आला.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, रमाई महोत्सव एका जातीधर्मापुरता मर्यादित नाही. जातीपाती पलिकडे पाहण्याची दृष्टी देणारा, भारतीय संस्कृतीला समर्पित असलेला असा हा महोत्सव आहे. रामजीबाबा यांच्या संस्कारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडले आहेत.
कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याविषयी मनोगत व्यक्त केले तर महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी स्वागतपर प्रास्ताविकात महोत्सवाविषयी माहिती दिली.
सत्काराला उत्तर देताना उषा कोतले म्हणाल्या, शिक्षण कमी झाल्याची खंत होती. पण मुलांना शिक्षित करून स्वत:च्या पायवर उभे केले याचा अभिमान आहे.
शैलेंद्र मोरे म्हणाले, आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून संघर्ष करत सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला. मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून घडविले. पुरस्कारामुळे सामाजिक कार्याची जबाबदारी वाढली आहे. ज्ञानेश्र्वर मोळक यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार लता राजगुरू यांनी मानले.
फोटो ओळ : महामाता रमाई महोत्सवातील रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) लता राजगुरू, शैलेंद्र मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, उषा कोतले, ॲड. प्रमोद आडकर, विठ्ठल गायकवाड, ज्ञानेश्र्वर मोळक.
प्रति,
मा. संपादक
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामाता रमाई महोत्सवाचे उद्घाटन आज (दि. २) डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
विठ्ठल गायकवाड, संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१
