निरोगी, सुसंस्कृत व प्रगतशील समाज घडावा
- डॉ. जीवन चौधरी यांचे मत; गुजर स्नेहवर्धिनीच्या वतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन
पुणे: “समाजातील प्रत्येक घटकाचे आरोग्य महत्वाचे असते. निरोगी, सुसंस्कृत व प्रगतशील समाजाची जडणघडण व्हावी, यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. समाज आरोग्यदृष्ट्या सशक्त झाला, तरच तो सर्वांगीण प्रगती साधू शकतो. त्यामुळे सुरक्षित व आनंदी समाज घडविण्यात संस्थेने पुढाकार घ्यावा,” असे मत प्रोलाईफ फर्टिलिटी अँड मदर केअरचे तज्ज्ञ डॉ. जीवन चौधरी यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्ह्यातील गुजर समाजाची विश्वासार्ह असलेल्या गुजर स्नेहवर्धिनी संस्थेतर्फे आयोजित वार्षिक स्नेहमेळाव्यात डॉ. चौधरी बोलत होते. गुजर समाजाच्या ऐक्याचा, उद्यमशीलतेचा व संस्कारांचा हा सोहळा हडपसर येथील आकाश लॉन्समध्ये नुकताच झाला. गुजर स्नेहवर्धिनी पुणेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी स्नेहमेळाव्याचे अध्यक्षस्थान भूषविले. डॉ. प्रशांत चौधरी यांनी संयोजन केले.
प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत संजय कुलकर्णी, पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर, भारती आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अभिजीत पाटील, बांधकाम व्यावसायिक भागवत पाटील, निवृत्त न्यायाधीश दिनेश महाजन, संस्थेचे सचिव सचिन शहा, कार्याध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष प्रदीप पाटील व पंकज चाचरे, खजिनदार संदीप पाटील, विश्वस्त डी. एस. चौधरी आदी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील सुमारे ८०० गुजर समाजबांधवांनी उपस्थिती लावली.
समाजातील निरंजन गोपीचंद महाजन, विजय तुकाराम पाटील, रवींद्र पांडुरंग चौधरी, प्रशांत शांताराम महाजन आणि दीपक नंदकिशोर पाटील या पाच कर्तृत्ववान तरुण उद्योजकांना ‘गुजररत्न-तरुण उद्योजक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या, पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
अजय गुजर म्हणाले, “चाळीस वर्षांपूर्वी डॉ. सि. तु. उर्फ दादासाहेब गुजर यांनी समाजाला एकत्रित करून समाजाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी संस्थेची स्थापना केली. आज पुणे आणि परिसरातील समाज एकवटला असून, एकमेकांच्या साथीने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.”
संजय कुलकर्णी यांनी ‘कुटुंब प्रबोधन’ विषयावर मार्गदर्शन करताना एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व, तसेच हिंदू संस्कृतीतील चांगल्या परंपरा पुढील पिढीपर्यंत हस्तांतरित करण्याची गरज अत्यंत प्रभावीपणे विशद केली. यावेळी समाजातील बालगोपालांनी सादर केलेल्या नृत्य, गायन, तबलावादन आदी कलाविष्काराने रसिकांची मने जिंकली.
अनुष्का महाजन व निलेश महाजन यांनी सूत्रसंचालन केले. सचिन शहा यांनी प्रास्ताविक केले. यावर्षी स्नेहमेळाव्याचे नियोजन डॉ. प्रशांत चौधरी यांच्यासह हडपसर परिसरातील गुजर बांधवांकडे होते.
