July 4, 2025

साहित्यिकाला सत्याचा, विवेकाचा धर्म असावा : डॉ. श्रीपाल सबनीसवैशाखी वादळ वारा काव्य महोत्सव उत्साहात

0
IMG-20250609-WA0027
Spread the love

पुणे : मराठी कवी, साहित्यिक हे प्रेम, अलिंगन, चुंबन, शेती-माती, नाती-गोती यांच्यातच अडकून पडले आहेत. कवीने महाराष्ट्राच नव्हे तर देशाचा नकाशा ओलांडून विश्वात्मकता अंगीकारण्यासाठी प्रयत्न करावेत. साहित्यात वैश्विक संस्कृती, अर्थकारण, शोषण, युद्ध, जागतिक प्रश्न अशा विषयांवर भाष्य करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली. साहित्यिकाला सत्याचा, विवेकाचा धर्म असावा, असेही त्यांनी सूचित केले.
ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड यांनी आयोजित केलेल्या वैशाखी वादळ वारा काव्य महोत्सवाचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण सोहळा डॉ. सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी फाऊंडेशन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या पन्नासहून अधिक कवींनी कविता सादर केल्या. कवी आणि साहित्यिकांचा या वेळी पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे, सागर मिटकरी, सूर्यकांत तिवडे, प्रकाश देशमुख, कविसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्र भणगे आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, सांस्कृतिक लोकशाही बळकट झाल्यास राजकारणी लोकशाही बळकट होईल. या कविसंमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक संस्था द्वेष भावनेशिवाय कार्यरत आहेत असे जाणवते. ही सांस्कृतिक एकात्मकता राजकीय नेत्यांनीही शिकावी. जाती-पातीच्या भिंती ओलांडून निधर्मी, संविधान संस्कृती निर्माण व्हावी. आजच्या काळात नव्या हिटलरांची उपज थांबविणे गरजेचे आहे. विश्वात शांतता नांदावी या करिता साहित्यिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
बबन पोतदार म्हणाले, साहित्यिकाच्या हातून साहित्यकृती कशी निर्माण होते याची अनुभूती या काव्य संमेलनातून आली. कवींच्या सान्निध्यात खूप आनंद होत आहे. प्रकाश देशमुख, सुर्यकांत तिवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात चंद्रकांत जोगदंड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.

फोटो ओळ : वैशाखी वादळ वारा काव्य महोत्सवात बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस. समवेत बबन पोतदार, चंद्रकांत जोगदंड, सागर मिटकरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button