April 1, 2026

कार्यक्रमाचे यशापयश निवेदकावर अवलंबून : डॉ. सदानंद मोरेरंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे स्नेहल दामले यांचा उद्धव कानडे स्मृती पुरस्काराने गौरवनिवेदन ही 66वी कला : डॉ. सदानंद मोरे

0
IMG-20250608-WA0025(1)
Spread the love

पुणे : सार्वजनिक कार्यक्रमांमधील निवेदक-सूत्रसंचालक हा महत्त्वाचा घटक असून निवेदकाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालेले आहे. निवेदन ही सुद्धा कला असून कार्यक्रमाचे यशापयश निवेदकावर अवलंबून असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिवंगत कवी, निवेदक उद्धव कानडे स्मृती पुरस्काराने प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामले यांचा आज (दि. 8) गौरव करण्यात आला. पुरस्कराचे वितरण डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी संस्थेच्या 33 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला.

रंगत-संगत प्रतिष्ठानच्या 33 वर्षांच्या वाटचालीचा आणि उद्धव कानडे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून डॉ. मोरे पुढे म्हणाले, पुरस्कार वितरण सोहळा औचित्यपूर्ण आहे. 14 विद्या आणि 64 कला असे पूर्वी म्हटले जायचे. आधुनिक काळात जाहिरात ही सुद्धा कला मानली जाऊ लागली. आजच्या काळात निवेदक-निवेदनाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले असल्याने निवेदन ही 66वी कला आहे.

डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, निवेदन ही सुंदर कला असून आशयपूर्ण निवेदन रसिकांच्या मनापर्यंत पोहोचते आणि कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त होते. सत्कार समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम हा चंगळवाद नाही तर अशा कार्यक्रमांद्वारे होणाऱ्या वैचारिक अदानप्रदानातून प्रगल्भता येते. अंतरीचा ज्वर शांत होण्यासाठी कार्यक्रम उपयुक्त ठरतात, असेही त्या म्हणाल्या.

सत्काराला उत्तर देताना स्नेहल दामले म्हणाल्या, प्रसिद्ध निवेदक, कवी उद्धव कानडे यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने आनंदाची धनी झाल्याची भावना आहे. शून्यातून सुरू केलेल्या वाटचालीत कुटुंबिय, मित्र, संयोजक आणि रसिक यांचा मोठा वाटा आहे. सुहृदांनी गुण-दोषांसकट स्वीकार केला याचा सात्विक अभिमान आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यात प्रभा सोनवणे, मृणालिनी कानिटकर-जोशी, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, स्वाती दाढे, डॉ. मिलिंद शेंडे, चंचल काळे, सचिन हनमघर, विनायक अनिखिंडी, केतकी देशपांडे, सुजाता पवार यांचा सहभाग असणार होता. अंजली कुलकर्णी अध्यक्षस्थानी होत्या. ऋचा बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळ : रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) मैथिली आडकर, ॲड. प्रमोद आडकर, स्नेहल दामले, डॉ. सदानंद मोरे, डॉ. संगीता बर्वे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी