February 15, 2026

यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी आवश्यक: डॉ भारतभूषण जोशी

0
IMG-20250609-WA0060
Spread the love

कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या पहिल्या वर्गाचे उद्घाटन

पुणे / लोणावळा : यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि अशी प्रगतिशील दृष्टी प्रयत्नांनी विकसित करावी लागते, असे मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ भारतभूषण जोशी यांनी व्यक्त केले.

लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकादमीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ॲड. माधव भोंडे, उपाध्यक्ष नारायण भार्गव, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ प्रा जगदीशचंद्र मठ, राजेंद्र चतुर्वेदी, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क शिक्षणाधिकारी सुनील पोटे, विश्वस्त पंडित विद्यासागर,अभिनेत्री आणि संस्थेच्या विश्वस्त मीनाक्षी शेषाद्री सचिव राधिका भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी देखील आजपर्यंत माणसाला विश्वाच्या एकूण पसाऱ्यापैकी केवळ पाच टक्के माहिती उपलब्ध झाली आहे. या पुढील काळात उर्वरित माहिती उजेडात आणण्याचे काम युवा शास्त्रज्ञांचे आहे. त्यासाठी युवकांना मोठा वाव उपलब्ध आहे, अशी जोशी यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येकाने कल्पना चावला यांच्यासारखे अंतराळवीर व्हावे असे नाही तर अभियंता, शास्त्रज्ञ, कलाकार अशा कोणत्याही भूमिकेतून मानवतेच्या प्रगतीसाठी योगदान दिले जाऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

अंतराळ विज्ञानात भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश असून तो लवकरच प्रथम क्रमांकावर विराजमान होणार आहे. अंतराळ वैज्ञानिक घडविण्याच्या उद्देशाने कल्पना चावला स्पेस अकादमीची स्थापना करण्यात आली असून अत्यंत काटेकोरपणे या अकादमीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड करताना प्राधान्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. सध्याचे युग हे स्पर्धा करण्याचे नव्हे तर सहकार्य करण्याचे आहे. त्यामुळे या संस्थेसाठी इस्रो, नेहरू स्पेस सेंटर अशा अनेक संस्थांशी सहकार्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती भार्गव यांनी यावेळी दिली.

कल्पना चावला स्पेस अकादमीच्या अभ्यासक्रमाबद्दलची माहिती जगदीश चंद्र मठ यांनी दिली. उत्सुकताही प्रगतीची जननी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणे यावर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. प्रथम दोन वर्षात अंतराळ विज्ञानाची मूलभूत तत्व विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे. त्यानंतर अंतराळ विज्ञानातील विविध शाखांपैकी विद्यार्थ्यांना रस असलेल्या शाखेची निवड करून त्या शाखेचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंतराळ संशोधन संस्थेमध्ये उमेदवारी हा देखील अभ्यासक्रमाचा घटक असणार आहेत. त्याचप्रमाणे यशस्वी शास्त्रज्ञ घडवण्याबरोबरच नीतिवान, भावनिक दृष्ट्या सबळ व्यक्तिमत्व घडविण्यासाठी जीवन विद्येचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे, असेही प्रा मठ यांनी सांगितले.

अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण देणारी कल्पना चावला स्पेस अकादमी ही भारतातील, किंबहुना जगातील एकमेव संस्था असून या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याची ग्वाही राजेंद्र चतुर्वेदी यांनी यावेळी दिली.

सुनील पोटे यांनी संस्थेला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. देवतोष कृष्णा यांनी सूत्रसंचालन केले तर राधिका भोंडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी