संत वाङ्मयाची कास धरली तर जीवन परिपूर्णह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशी ; जाधवर इन्स्टिटयूटस्तर्फे ६ व्या कीर्तन महोत्सवात कीर्तन महर्षी पुरस्कार प्रदान
पुणे : आपण कितीही मोठे झालो तरी, आपली मात्रभूमी, आई-वडील, ग्रंथ, पंथ, संप्रदायाचा विसर पडू देऊ नये. संत वाङ्मयाची कास ज्यांनी धरली, त्यांच्या जीवनात कधीही कमतरता पडत नाही. आज अभ्यासक वाढले पण उपासना पद्धती नष्ट होत चालली आहे. आपले समग्र वाङ्मय अन्य भाषेत भाषान्तरित होणे गरजेचे आहे, असे ह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशी यांनी सांगितले.
न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे सहाव्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले. त्यामध्ये यंदाचा कीर्तन महर्षी पुरस्कार ह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशी यांना तर, मृदूंगभीष्म पुरस्कार मृदूंगाचार्य अप्पा महाराज दातार यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते.
अमृताश्रम महाराज म्हणाले, सामाजिक कार्य ही ईश्वरसेवाच आहे. ती संधी ठराविक जणांना मिळते. अंतःकरण, शास्त्र आणि गुरुकृपा या तीन कृपा महत्वाच्या आहेत. वैदिक व सनातनी विचार आत्मसात करायला बाहेरच्या लोकांना अडचण येते. त्यामुळे विविध प्रकारच्या भाषा आपल्याला देखील यायला हव्या.
शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांना कीर्तनाद्वारे प्रबोधनाकरीता कीर्तन महोत्सव घेण्यात आला. त्यामध्ये ह.भ.प. सुनील महाराज निवंगुणे, ह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशी, ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांचघे कीर्तन आणि महोत्सवाचा समारोप शिवशंभु व्याख्याते, भागवत कथाकार ह.भ.प.गुरुवर्य राजेंद्र महाराज येप्रे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला.
ह.भ.प.येप्रे महाराज साधक वर्ग आणि समस्त ग्रामस्थ न-हेगाव यांनी संयोजनात सहभाग घेतला आहे. शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटटस्च्या वतीने या सहाव्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
- फोटो ओळ : न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे सहाव्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले. त्यामध्ये यंदाचा कीर्तन महर्षी पुरस्कार ह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर.
