‘स्वरसंध्येतून’ भक्तिरसाचा सुरेल अविष्कारग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संगीत नाटक, अभंग आणि भक्तिगीते सादर
पुणे : संत नामदेव…संत तुकाराम या महाराष्ट्रातील संतांचे गाजलेले अभंग भावपूर्ण गायकीतून गायकांनी सादर केले. भक्तिरसाचा सुरेल अविष्कार पुणेकरांना यानिमित्ताने अनुभवायला मिळाला. ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान च्यावतीने आयोजित स्वरसंध्या कार्यक्रमात कसबा गणपती मंदिराचा परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला.
श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने ‘स्वरसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थानचे पुजारी प्रमोद ठकार, सीमा ठकार आणि इतर विश्वस्त उपस्थित होते. मध्ये गायिका श्रद्धा गद्रे आणि जान्हवी गद्रे यांनी सादरीकरण केले. चेतन ताम्हणकर (तबला), पीयूष कुलकर्णी (संवादिनी) यांनी साथसंगत केली तर, कीर्ती कुलकर्णी यांनी निवेदन केले.
कार्यक्रमाची सुरुवात बालगंधर्व चित्रपटातील संगीत शाकुंतल या नाटकातील ‘पंचतुंड नररुंडमालध; या नांदिच्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर यमन रागातील गणेशावर आधारित बंदिश सादर करण्यात आली, ज्याला उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा गजर करून भरभरून दाद दिली. यानंतर पाच नाजुक बोटे या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांनी रचलेले ‘आज अयोध्या सजली’ हे गीत सादर झाले. या गीतातून अलौकिक पूजेचा आणि आनंद तरंगाचा भाव प्रकट झाला.
कार्यक्रमात पुढे गणराज रंगी नाचतो, रचिल्या ऋषीमुनींनी, क्षणभर उघडी नयन देवा, शंभो शंकरा या विविध रचना सादर झाल्या. अविट गोडीच्या गीतांनी आणि भावपूर्ण सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. संत नामदेवांची सावळा ‘नंदाचा मूल खोटा गे’ ही गवळण आणि संत तुकारामांचा ‘खेळ मांडीयेला’ हा अभंग सादर झाला. ‘आधी देवा पांडुरंगा’ या भक्तिगीताने वातावरण भक्तिरसात रंगले. अखेरीस संत नामदेव यांच्या रचना असलेल्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
त्यापूर्वी भक्तिरंग हा भक्तीगीते व अभंगाचा कार्यक्रम देखील मंदिरात पार पडला. यामध्ये गायिका रमा कुलकर्णी यांनी सादरीकरण केले. तर, रोहन वनगे, प्रसन्न बाम, अभिजीत जायदे यांनी वादनाला साथसंगत केली.
फोटो ओळ : श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने ‘स्वरसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सादरीकरण करताना कलाकार.
