गुजरातमधील अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या AI-171 विमानाचा अपघात (AI 171 Crash) आणि त्यानंतरच्या घडामोडींवर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्याशी ‘टाइम्स नाऊ’च्या मुख्य संपादक नविका कुमार यांनी विशेष मुलाखतीत संवाद
साधला. लंडनला जाणारे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच कोसळलं. यात विमानावरील 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर फक्त एकच प्रवासी बचावला. या भीषण दुर्घटनेनंतर एन चंद्रशेखरन यांनी अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे दिली.
विमानाच्या सुरक्षिततेवर स्पष्टीकरण
टाटा सन्सच्या अध्यक्षांनी एअर इंडियाच्या विमान अपघाताशी संबंधित अनेक प्रश्नांवर उत्तरं दिली. ते म्हणाले, या अपघातग्रस्त विमानाची हिस्ट्री क्लिन होती. त्यात यापूर्वी देखील कोणतीही तांत्रिक समस्या उद्भवली नव्हती. ‘याबाबत अनेक तर्कवितर्क आणि सिद्धांत मांडले जात आहेत. पण मला आतापर्यंत जी माहिती आहे ती अशी की, हे विशिष्ट विमान, AI-171, म्हणजेच त्याच्या शेपटीचा भाग, याचा रेकॉर्ड पूर्णपणे क्लिन आहे.’
एन चंद्रशेअरन यांनी अपघातग्रस्त विमानांच्या दोन्ही इंजिनबद्दलही यावेळी माहिती दिली. कारण, या भीषण अपघातानंतर ती चर्चेचा विषय बनली होती.”या विमानाची दोन्ही इंजिन, त्यापैकी उजवं इंजिन नवीनच होतं, ते मार्च 2025 मध्ये बसवलं होतं. डाव्या इंजिनची शेवटची सर्व्हिसिंग 2023 मध्ये झाली होती आणि त्याची पुढील देखभाल तपासणी डिसेंबर 2025 मध्ये होणार होती,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चंद्रशेखरन यांनी अपघातात मृत पावलेल्या विमानाचे कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर या दोघांचेही कौतुक केले. त्यांना “उत्कृष्ट पायलट” आणि “उत्तम व्यावसायिक” असे संबोधले.
“कॅप्टन सभरवाल यांना 11,500 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव होता. आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह यांना 3,400 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव होता,” असे एन चंद्रशेअरन यांनी यावेळी सांगितले.
मात्र, एन चंद्रशेअर यांनी पुन्हा एकदा सांगितले, की अधिकृत चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये. सध्या उपलब्ध असलेले फॅक्ट्स आणि नोंदी यावरच ते चर्चा करत आहे.
DGCA च्या ‘रेड फ्लॅग’चा दावा फेटाळला
डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (DGCA) देखभालीशी संबंधित काही ‘रेड फ्लॅग’ जारी केले होते, हे दावेही एन चंद्रशेखरन यांनी यावेळी फेटाळून लावले. ते म्हणाले, “मी या विमानाचा, इंजिनचा आणि पायलटचा इतिहास पाहिला आहे. मी टीमसोबत बसून यावर चर्चा केली. मला कोणतेही ‘रेड फ्लॅग’ दिसले नाहीत, आणि त्यांनीही असे कोणतेही ‘रेड फ्लॅग’ दाखवले नाहीत.”
तुर्की तंत्रज्ञानाने विमानांच्या देखभालीबाबत विचारले असता, चंद्रशेखरन यांनी सांगितले की, समूहाच्या मालकीच्या एकाही 787 ड्रीमलाइनर विमानाची देखभाल त्या तंत्रज्ञानाने केली जात नाही. ते म्हणाले, “बहुतेक विमानांची देखभाल भारतात एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) किंवा सिंगापूर एअरलाइन्स इंजिनिअरिंग (SIA) या कंपन्यांकडून केली जाते. या कंपन्याच या विमानांची देखभाल करतात. 787 फ्लीटसाठी त्यांचा कोणत्याही तुर्की कंपनीशी संबंध नाही, असेही एन चंद्रशेखरन त्यांनी स्पष्ट केले.
बोईंग ड्रीमलाइनर्सच्या सुरक्षा चिंतेवर टाटा सन्सच्या अध्यक्षांनी सांगितले की, ही विमाने जागतिक स्तरावर खूप काळापासून कार्यरत आहेत आणि त्यांना कोणतीही विशिष्ट तक्रार मिळाली नव्हती.
“हे असे मुद्दे आहेत जे अमेरिकेतील तपास यंत्रणा हाताळत आहेत. पण एकंदरीत, 787 विमाने खूप काळापासून उडत आहेत. आणि एअर इंडियामध्येही 787 विमाने खूप काळापासून वापरली जात आहेत,” असे ते म्हणाले.
विमान उड्डाणांतील व्यत्यय आणि दळणवळण
चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाच्या उड्डाणांमध्ये अलीकडे झालेल्या रद्दबातल आणि मार्गातील बदलांवरही भाष्य केले. 12 जूनपासून 66 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली होती. या उड्डाण व्यत्ययामागील मुख्य कारणे त्यांनी सांगितली, ते म्हणाले… “12 तारखेला अपघात झाल्याबरोबर, DGCA ने सर्व 787 विमानांवर अतिरिक्त तपासणीचे निर्देश दिले. त्यामुळे, आम्हाला अनेक 787 विमाने जमिनीवर उतरवावी लागली. परिणामी, आमच्याकडे विमानांची कमतरता निर्माण झाली, ज्यामुळे आम्हाला काही उड्डाणे रद्द करावी लागली. हे एक कारण आहे.”
“दुसरं कारण म्हणजे इराणमधील हवाई मार्ग बंद झाला आहे, मध्य-पूर्वेत जे काही घडत आहे त्यामुळे विमानांना मार्ग बदलावे लागत आहेत,” असे एन चंद्रशेखरन यांनी सांगितले.
“आणि या दोन्ही कारणांचा एकमेकांवर परिणाम होतो, कारण विमान वेळेत पोहोचले नाही, तर ते विमान पुढचे उड्डाण घेऊ शकत नाही. आणि ते उड्डाण घेऊ शकले नाही, तर आम्हाला ते रद्द करावे लागते कारण दुसरे विमान उपलब्ध नसते,” असे चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केलं.
“तिसरं कारण तांत्रिक समस्या आहेत. जेव्हा आम्ही कोणत्याही ठिकाणी उड्डाण करतो आणि उतरतो, तेव्हा ‘लाइन चेक’ केले जातात. आणि अधूनमधून, प्रत्येक फ्लाइटमध्ये नाही, पण ‘लाइन चेक’मध्ये काही सुटे भाग बदलावे लागतात किंवा काही दुरुस्ती करावी लागते, हे सामान्य आहे,” असेही त्यांनी सांगितले.
मात्र, एन चंद्रशेखरन यांनी कबूल केलं की, या व्यत्ययांमुळे एअर इंडियाने संवाद अधिक चांगल्याप्रकारे हाताळायला हवा होता. त्यांनी आश्वासन दिलं की, एअर इंडियानं एक नवी कम्युनिकेशन टीम स्थापन केली आहे. आम्ही गेल्या तीन दिवसांत एक स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन टीम स्थापन केली आहे. आज आम्ही 12 जून रोजी काय घडले आणि त्यानंतर इतक्या उड्डाणे रद्द का झाली, हे स्पष्ट करणारे पहिले सर्वसमावेशक माध्यम निवेदन प्रसिद्ध केले आहे,” असे त्यांनी सविस्तर सांगितले.
टाटा समूहाचा वारसा आणि मूल्ये
संकट खूप गंभीर आहे. आम्ही त्याची भीषणता मान्य करतो, असे चंद्रशेखरन यांनी सांगितले, ते म्हणाले, टाटा समूहाने दोन महायुद्धे ते 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यापर्यंत अनेक संकटे झेलली आहेत. तरीही आपला मूळ गाभा अबाधित ठेवला आहे. “टाटा समूह नेहमीच प्रामाणिक राहून, पारदर्शकता दाखवून आपल्या मूल्यांवर ठाम राहिला आहे, यामुळेच या समूहाचे जतन झाले आहे आणि लोकांचा विश्वास कायम राहिला आहे.”
चंद्रशेखरन यांनी टाटा समूहाच्या वारशावर प्रकाश टाकत, संस्थापक जे.आर.डी. टाटा (JRD Tata) कशासाठी उभे होते, याची आठवण करून दिली. “मी टाटा उत्पादन आहे आणि समूहाने, मग ते संस्थापक असोत किंवा जे.आर.डी. टाटा किंवा रतन टाटा कशासाठी उभे राहिले, त्या मूल्यांवर मी मोठा झालो आहे. रतन टाटांसोबत माझे खूप जवळचे नाते होते, आणि आमची खूप मैत्री आणि परस्पर आदर होता, पण या लोकांनी दाखवलेली मूल्ये, पारदर्शकता आणि करुणा समूहात अजूनही जिवंत आहे,” असे ते म्हणाले.
“मी जे.आर.डी. नाही. मी रतन नाही. पण आम्ही सर्व या मूल्यांनी प्रेरित आहोत,” समूह या कठीण काळातही या मूल्यांचे पालन करत पुढे जाईल, असे सांगत एन चंद्रशेखरन यांनी आशा व्यक्त केली.
