वाढदिवशी फुलं नको, ई-कचरा द्या, आमदार हेमंत रासनेंचा पर्यावरणपूरक उपक्रम
- ई-कचऱ्याचा वाढता धोका रोखण्यासाठी हेमंत रासनेंचा पुढाकार, वाढदिवसाला शुभेच्छा म्हणून ई-कचरा आणण्याचे आवाहन
पुणे (दि ११): पुणे शहरासह जगभरात ई-कचरा ही वेगाने वाढणारी आणि गंभीर होत चाललेली समस्या आहे. शहरात दरवर्षी अंदाजे 20,000 ते 26,000 टनांपेक्षा जास्त ई-कचरा तयार होतो. मात्र या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने होणे गरजेचे असताना, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी आपल्या वाढदिवसाला फुले तसेच भेटवस्तू नको, तर शुभेच्छारुपी ई-कचरा भेट देण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी १३ एप्रिल रोजी शनिपार जवळील कवठी अड्डा या आरोग्य कोठीवर वस्तुंचे संकलन केले जाणार आहे.
मोबाईल, संगणक, टीव्ही, चार्जर्स, बॅटऱ्या यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढत असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लागल्याने पर्यावरण व मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या कचऱ्यामध्ये शिसे, पारा, कॅडमियमसारखे घातक रसायने असतात. हे घटक माती, पाणी आणि हवेमध्ये मिसळून दीर्घकालीन प्रदूषण निर्माण करतात. त्यामुळे ई-कचऱ्याचे वैज्ञानिक आणि सुरक्षित पद्धतीने पुनर्वापर (Recycling) व विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे आहे.
आमदार हेमंत रासने यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ अभियान राबवले जात असून मतदारसंघात स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या मोहिमेअंतर्गत वाढदिवसानिमित्त जमा होणाऱ्या ई-कचऱ्याची पुणे महापालिकेच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यापुढे देखील ई-कचरा संकलन व त्यावर योग्य प्रक्रिया करण्याचा उपक्रम मतदारसंघात कायमस्वरूपी राबवला जाणार आहे.
आमदार हेमंत रासने यांची प्रतिक्रिया
“आज ई-कचरा ही केवळ शहराची नाही तर जागतिक पातळीवरील गंभीर समस्या बनली आहे. आपण दररोज वापरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा योग्य पद्धतीने व्यवस्थापित केला नाही, तर त्याचे दुष्परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागतील. माझ्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी फुलं किंवा भेटवस्तू न देता ई-कचरा देऊन पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा, हीच अपेक्षा आहे. छोट्या कृतीतून मोठा बदल घडू शकतो.”
पुणे शहरात ई-कचऱ्याचे प्रमाण सातत्याने वाढत असताना त्याचे औपचारिक व्यवस्थापन अजूनही पुरेसे सक्षम झालेले नाही. त्यामुळे अनौपचारिक क्षेत्रावर अवलंबित्व वाढत असून पर्यावरणीय धोके अधिक गंभीर बनत आहेत. अशा परिस्थितीत हेमंत रासनेंचा हा उपक्रम नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास आणि ई-कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
