रामनवमी मिरवणुकीत ‘जनजागृतीचा संदेश’; महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार प्रतिष्ठानचा पुढाकार
लव्ह जिहादविरोधी जनजागृती रथाचे आकर्षण; धायरीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे : सरकार प्रतिष्ठान आणि अखिल नरवीर तानाजी मालुसरे पथ श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त आयोजित भव्य मिरवणुकीत यंदा सामाजिक जनजागृतीसोबत पारंपरिक संस्कृतीचा देखील उत्साहपूर्ण संगम पाहायला मिळाला. महिलांच्या सुरक्षेचा संदेश देत आणि युवक-युवतींमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले.
या मिरवणुकीत मल्हार-बानू विवाह सोहळ्याचे सादरीकरण, परशुराम वाद्य पथक, आकर्षक श्रीराम रथ, कर्नाटकी देखावे, वारकरी भजनी मंडळ तसेच पारंपरिक बँड यांचा समावेश होता. या सर्व देखाव्यांमुळे मिरवणुकीला वेगळे आकर्षण प्राप्त झाले.
यावेळी महिला संघटिका लक्ष्मी मंगेश कदम यांनी सांगितले की, “सरकार प्रतिष्ठान दरवर्षी सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवत असून यंदा दुसऱ्या वर्षीही मोठ्या उत्साहात रामनवमी मिरवणूक काढण्यात आली. समाजात घडणाऱ्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर युवतींमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.”
मिरवणुकीत ‘लव्ह जिहाद’ विषयावर आधारित जनजागृती रथ हे प्रमुख आकर्षण ठरले. या रथातून सत्य घटनांवर आधारित देखावे सादर करून समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. “युवतींनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता धैर्याने व सजगतेने राहावे,” असा संदेश त्यांनी दिला.
या मिरवणुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. धायरी परिसरातील विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. अन्याय करणाऱ्यांविरोधात कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याची भूमिका संस्थेने घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार प्रतिष्ठान सदैव कटिबद्ध राहील, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
या मिरवणुकीचे आयोजन सचिन सोनवणे, अक्षय उंद्रे, गणेश खामकर, अजिंक्य जाधव, संदीप स्वामी आणि गणेश पासलकर यांनी केले. कार्यक्रमासाठी निमंत्रक म्हणून महिला संघटिका लक्ष्मी मंगेश कदम यांनी पुढाकार घेतला.
