एक गाय वाचली तर एक आत्महत्या थांबेलअभिनेता प्रवीण तरडे ; गौ टेक ग्लोबल समिट व एक्स्पोचे उद्घाटन ; तब्बल ३ लाख अभ्यागत, २०० पेक्षा अधिक स्टॉल्स व विविध उपक्रम; विनामूल्य प्रवेश
पुणे : गाईकडून दूध संपल्यानंतर पुढील दहा वर्ष गाय गोमूत्र आणि शेणावर एका कुटुंबाला जगवू शकते. एक गाय वाचली तर एक आत्महत्या थांबेल. त्यातून महाराष्ट्र समृद्ध होईल. गाईचा विषय जगभर पोहोचला पाहिजे. दूध आटले की गाय खाटकाकडे न्या, ही गोष्ट थांबली पाहिजे. दूध ही एक निर्मिती आहे. त्यापुढे देखील खूप काही उत्पादने आहेत. गाईच्या डोळ्यातील कारूण्य शेतकऱ्याला जगण्याची प्रेरणा देईल, असे मत प्रसिद्ध अभिनेता प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज (जीसीसीआय) यांच्या वतीने, महाराष्ट्र गो सेवा आयोग आणि आर. आर. काबेल यांच्या सहकार्याने “गौ टेक २०२६” या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद व प्रदर्शनाचे आयोजन कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास खर्चे, गुजरातचे माजी मंत्री भूपेंद्र सिंह चूड़ासमा, उत्तराखंड गोसेवा आयोग अध्यक्ष राजेंद्र अथवाल, जैन आचार्य लोकेश मुनि, आमदार हेमंत रासने, पुणे भाजपा अध्यक्ष धीरज घाटे, गोवा-महाराष्ट्र पोस्ट मास्टर जनरल प्रमुख अमिताभ सिंग, राज देशमुख, राघवन तसेच उद्योजक कृष्णकुमार गोयल, दिलीप काळे, जीसीसीआयचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री तसेच राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया, महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष व गौ टेक २०२६ चे आयोजनाध्यक्ष शेखर मुंदडा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
भारतीय डाक विभागातर्फे विशेष कव्हर व तिकीट मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. सोमवार, दि. २३ मार्च पर्यंत हे चार दिवसीय प्रदर्शन असून प्रवेश विनामूल्य आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ.विलास खर्चे म्हणाले, शेतीमध्ये गोमातेचे मोठे योगदान आहे. रसायनांचा उपयोग शेतीत मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे हा रसायनांचा उपयोग कमी करण्यास प्राकृतिक शेतीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात हे प्रयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेमंत रासने म्हणाले, गाईकडून सर्व पद्धतीने उपयोग होतो. त्याची गुणवत्ता लोकांपर्यंत पोहोचवून जगभरात ते गाईचे महत्व सांगण्याचे काम सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले. जैन आचार्य योगेश मुनी म्हणाले, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात भारतमाता, जन्मदात्री माता आणि गोमाता या तिन्हींचे खूप महत्व आहे. त्यामुळे प्रत्येकाला गोमातेबद्दल आदर असायला हवा. आपण आत्मनिर्भरतेकडे गेलो तर गोसंवर्धन करणे शक्य आहे.
डॉ. वल्लभभाई कथिरिया म्हणाले, गौ-आधारित उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या आयोजनामागील उद्देश आहे. हे केवळ एक प्रदर्शन नसून गौ-आधारित अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून भारताला आत्मनिर्भर व संस्कारित बनविण्याच्या दिशेने एक व्यापक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभियान आहे. गौ टेक २०२६ मध्ये धोरणकर्ते, समाजसेवक, शास्त्रज्ञ, उद्योगपती, स्टार्ट-अप्स, गुंतवणूकदार, शेतकरी, गौशाळा, विद्यापीठे, संत समाज, महिला व युवक देश-विदेशातून मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
शेखर मुंदडा म्हणाले, तब्बल ३ लाख अभ्यागत, २०० पेक्षा अधिक स्टॉल्स व विविध उपक्रम यामध्ये आहेत. प्रदर्शनामध्ये सेंद्रिय खत व बायो-फर्टिलायझर्स, दूध व मूल्यवर्धित दुग्ध उत्पादने, गौमूत्र व गोबरावर आधारित उत्पादने, नैसर्गिक शेती, पशुवैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठे, सीमेन प्रयोगशाळा, सेक्स-सॉर्टेड सीमेन व एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्रज्ञान, सौर व बायो-एनर्जी, चारा व बियाणे उद्योग, चारागाह विकास यंत्रसामग्री, शासकीय व खासगी बँका, सहकारी संस्था, दुग्ध संघ व फेडरेशन, विविध राज्यांचे गौ सेवा आयोग, अॅनिमल फूड प्रोसेसिंग युनिट्स, इनोव्हेटिव्ह स्टार्ट-अप्स, संशोधन व विकासावर आधारित गौ-उत्पादने, भारतीय देशी गौ-नस्लांचे लाईव्ह प्रदर्शन तसेच नॅचरोपथी, आयुर्वेद व पंचगव्य आधारित उपचार पद्धतींशी संबंधित स्टॉल्स सहभागी झाले आहेत.
डॉ. वल्लभभाई कथिरिया यांच्या मार्गदर्शनाखाली या आयोजनात शेखर मुंदडा, रमेश घेटीया, हंसराज गजेरा, अमिताभ भटनागर (जनरल सेक्रेटरी, जीसीसीआय), पुरीश कुमार (जनरल सेक्रेटरी, जीसीसीआय), डॉ. गिरीश शाह, डॉ. नितीन मार्कंडेय, संजय भोसले, उद्धव नेरकर, डॉ. सुनील सूर्यवंशी, सनत कुमार गुप्ता, मनीष वर्मा, परेश शाह तसेच इतर अनेकांसह डॉ. दिलीप कुलकर्णी, मंगल अकोले, डॉ. महेश लोहार, विनायक बोरोळे पाटील, कौस्तुभ देशपांडे, मल्हार चनियारा, रमेश ओसवाल, भाग्यश्री चौंडे, अश्विनी पाटील, डॉ. देशमुख, राजेंद्र चौहान, दिलीप काळे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
फोटो ओळ : ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज यांच्या वतीने महाराष्ट्र गो सेवा आयोग आणि आर. आर. काबेल यांच्या सहकार्याने आयोजित “गौ टेक २०२६” या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे येथे झाले. यावेळी उपस्थित मान्यवर.
