March 13, 2026

अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. बिमलेंद्र कुमार यांची निवड

0
IMG-20260312-WA0009
Spread the love

पुणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पद्मपाणी फाऊंडेशन आणि अभिजात भाषा संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २२ मार्च रोजी पुण्यात ‘अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी बनारस हिंदू विद्यापीठातील (BHU) पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे माजी विभागप्रमुख आणि ज्येष्ठ विद्वान प्रा. डॉ. बिमलेंद्र कुमार यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीची अधिकृत घोषणा संमेलनाचे मुख्य आयोजक राहुल डंबाळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे प्रमुख डॉ. महेश देवकर , संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सिद्धार्थ धेंडे, सहस्वागताध्यक्ष डॉ. गौतम चाबुकस्वार, तसेच पद्मपाणी फाऊंडेशनच्या संचालिका सुवर्णा डंबाळे यांनी संयुक्तपणे केली.

पाली साहित्यातील महत्त्वपूर्ण योगदान

प्रा. डॉ. बिमलेंद्र कुमार हे पाली भाषा आणि बौद्ध तत्त्वज्ञानातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत अभ्यासक मानले जातात. त्यांच्या निवडीमुळे या संमेलनाला वैचारिक आणि शैक्षणिक उंची प्राप्त होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

डॉ. कुमार यांनी पाली भाषेतील ‘अभिधम्म’ तत्त्वज्ञान, ‘धम्मसंगणी’ आणि ‘भेषज्जमंजूषा’ यांसारख्या जटिल ग्रंथांवर सखोल संशोधन केले आहे. त्यांनी आतापर्यंत १९ हून अधिक ग्रंथांचे संपादन केले असून १२५ हून अधिक संशोधन लेख विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

शैक्षणिक कार्य व जबाबदाऱ्या

डॉ. कुमार यांनी बनारस हिंदू विद्यापीठात पाली विभागाचे प्रमुख म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली आहे. याशिवाय दिल्ली विद्यापीठ आणि विश्वभारती विद्यापीठ (शांतीनिकेतन) येथेही त्यांनी अध्यापन केले आहे. अलीकडेच त्यांची नेपाळमधील लुम्बिनी बौद्ध विद्यापीठात ‘ICCR डॉ. बी. आर. आंबेडकर चेअर’चे पहिले प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

पुरस्कार आणि सन्मान

पाली भाषेतील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना उत्तर प्रदेश राज्यपालांचा ‘विशेष पुरस्कार’ तसेच अखिल भारतीय विद्वत परिषदेचा ‘विद्वत भूषण’ सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

संमेलनाचे उद्दिष्ट

हे संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या शैक्षणिक मार्गदर्शनाखाली आयोजित केले जात असून, पाली साहित्याचा प्रचार-प्रसार, संवर्धन आणि संशोधनाला चालना देणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. या संमेलनासाठी देशभरातील पाली भाषा अभ्यासक, संशोधक आणि साहित्यिक मोठ्या संख्येने पुण्यात उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी