रुग्ण हक्क परिषदेच्या अध्यक्षपदी उमेश चव्हाण यांची फेरनिवड
पुणे: रुग्णांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देणारे आणि राज्यभर आरोग्य चळवळीला गती देणारे उमेश भगवानराव चव्हाण यांची रुग्ण हक्क परिषदेच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये रुग्ण हक्क परिषदेचे कार्य विस्तारले आहे. शेकडो स्वयंसेवकांच्या माध्यमातून रुग्णांना कायदेशीर व वैद्यकीय मार्गदर्शन दिले जात आहे. आजपर्यंत तीन लाखांहून अधिक रुग्णांना मोफत उपचारासाठी मार्गदर्शन व मदत देण्यात आली आहे. तसेच राज्यभर १,४०० हून अधिक आरोग्य शिबिरे घेण्यात आली असू, त्याद्वारे साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला आहे.
रुग्णांच्या न्याय हक्कासाठी उमेश चव्हाण यांनी विविध प्रश्नांवर आंदोलने, निवेदन, भाषणे, व्याख्याने, मेळाव्यांद्वारे जनजागृती मोहीमा राबवल्या. खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या जादा बिलांविरोधात आवाज उठवून अनेक रुग्णांना दिलासा दिला. बहुचर्चित व लोकप्रिय ‘हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे?’ या पुस्तकाचे लेखन व त्याद्वारे रुग्णांना मार्गदर्शन त्यांनी केले आहे.
कोविड-१९ काळात छत्रपती शिवाजी महाराज कोविड रुग्णालय उभारून शेकडो रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आले. कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत कॅन्सर रुग्णांसाठी मोफत उपचार, शस्त्रक्रिया व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पृथ्वी मोबाईल क्लीनिकच्या माध्यमातून फक्त पाच रुपयात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
फेरनिवडीबद्दल बोलताना उमेश चव्हाण म्हणाले, “रुग्णांना न्याय मिळवून देणे आणि आरोग्यसेवेत पारदर्शकता आणणे हेच आमचे ध्येय आहे. आगामी काळात रुग्ण हक्क अधिक बळकट करण्यासाठी राज्यव्यापी अभियान राबविण्यात येईल. गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांकडे पैसे नसले तरी त्यांच्यावरील उपचार थांबणार नाहीत. पैसे नाहीत म्हणून कोणाचेही प्राण जाणार नाहीत.”
कार्यकर्त्यांनी उमेश चव्हाण यांच्या फेरनिवडीचे स्वागत करत पुढील काळात संघटनात्मक विस्तार आणि रुग्णांसाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
अधिक माहितीसाठी – 9850002207
