April 1, 2026

हवामान-तंत्रज्ञानाधारित स्मार्ट शेतीसाठी २५०० कोटींचा सामंजस्य करार

0
IMG-20260122-WA0044
Spread the love
  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दावोसमध्ये महाराष्ट्र शासन, रूरल एन्हान्सर्स ग्रुप व न्यूट्रीफ्रेश फार्म टेक यांच्यात शेतीविषयक पहिली भागीदारी

दावोस/मुंबई/पुणे : दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, रुरल एन्हान्सर्स ग्रुप आणि न्यूट्रीफ्रेश फार्म टेक इंडिया यांच्यात सुमारे २,५०० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रात आधुनिक, हवामान-संवेदनशील आणि तंत्रज्ञानाधारित स्मार्ट शेतीला चालना मिळणार आहे.

रूरल एन्हान्सर्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबर आयदे आणि ‘न्यूट्रीफ्रेश’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संकेत मेहता यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. प्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग मंत्रालयाचे प्रधान सचिव एन. बालागन, ‘एमआयडीसी’चे व्यवस्थापकीय सहसंचालक वेलारासू, रुरल एन्हान्सर्सचे प्रधान सल्लागार जयंत येरवडेकर आदी उपस्थित होते.

या सामंजस्य कराराअंतर्गत राज्यात हवामानाधारित स्मार्ट आणि तंत्रज्ञानाभिमुख शेती क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येणार असून, हा प्रकल्प एप्रिल २०२६ पासून कार्यान्वित होणार आहे. देशातील आघाडीची कंट्रोल्ड एन्व्हायर्नमेंट ऍग्रीकल्चर (सीईए) कंपनी असलेल्या न्यूट्रीफ्रेशचे तांत्रिक कौशल्य यामध्ये वापरण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरक्षित, सातत्यपूर्ण आणि उच्च दर्जाचे कृषी उत्पादन देण्यासाठी न्यूट्रीफ्रेश ओळखली जाते.

गणेश निकम आणि संकेत मेहता यांनी २०१९ मध्ये पुण्यात स्थापन केलेल्या न्यूट्रीफ्रेश फार्म टेक इंडिया कंपनीने २०२८ पर्यंत २,००० एकर क्षेत्रात विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वार्षिक २५० दशलक्ष डॉलर महसुलाचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीकडे ५० हून अधिक उत्पादने असून, भारतातील १५ पेक्षा अधिक राज्यांत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही कंपनी कार्यरत आहे.

रूरल एन्हान्सर्स ही संस्था फंडिंग एजन्सी व प्रोजेक्ट इंटिग्रेटर म्हणून काम पाहणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून धोरणात्मक, संस्थात्मक आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक सहाय्य दिले जाणार आहे. या गुंतवणुकीसाठी यूएई-आधारित वित्तीय संस्था, भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विकास वित्त संस्था आणि विदेशी बँकांच्या माध्यमातून वित्तपुरवठा होणार आहे. 

अंबर आयदे म्हणाले, “या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून मोठ्या प्रमाणावर थेट व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती, हवामान-संवेदनशील कृषी पद्धतींचा प्रसार, कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. रचनात्मक कार्यक्रम आणि निश्चित बाजारपेठेच्या जोडणीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन सकारात्मक बदल साधला जाणार आहे. रूरल एन्हान्सर्स आरोग्य, अन्न व कृषी, बंदरे व सागरी पायाभूत सुविधा, आयटी आणि शिक्षण आदी क्षेत्रांत कार्यरत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी