–संपूर्ण हिंदू समाज एकत्र आल्याशिवाय भेदभाव नष्ट होणार नाहीडॉ. आंबेडकरांना विश्व हिंदू परिषदेचे अभिवादन ; राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांचे प्रतिपादन
पुणे : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या शतकातील महानतम व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य अपमान, अन्याय आणि सामाजिक विषमतेशी लढताना गेले. शाळेत, नोकरीत आणि समाजात सर्वत्र त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला. या वेदनादायी अनुभवातून त्यांनी समतेचा, स्वाभिमानाचा आणि न्यायाचा मार्ग समाजासमोर ठेवणारे भारतीय संविधान दिले. मात्र संपूर्ण हिंदू समाज एकत्र आला नाही, तोपर्यंत भेदभाव पूर्णपणे नष्ट होऊ शकणार नाही,” असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद – पूर्व विभाग पुणे यांच्या वतीने कॅम्प येथील अरोरा टॉवर्स परिसरातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास विश्व हिंदू परिषदेचे धार्मिक विभागाचे संजय मुद्राळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, तसेच प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत उपस्थित होते.
आलोक कुमार म्हणाले, “आजही शिक्षण, नोकरी, आरोग्य आणि संधी यामध्ये अनुसूचित समाजाला समान हक्क पूर्णपणे मिळालेला नाही. त्या संधी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत न्यायाने पोहोचेपर्यंत बाबासाहेबांची लढाई अपूर्णच राहील. ती लढाई पूर्ण करण्याची जबाबदारी आपली सामूहिक आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन करून सामाजिक समता आणि एकात्मतेच्या दिशेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. समारोप बुद्ध वंदना घेऊन करण्यात आला आणि वातावरण करुणा, शांती व समानतेच्या संदेशाने भारावून गेले.
- फोटो ओळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद – पूर्व विभाग पुणे यांच्या वतीने कॅम्प येथील अरोरा टॉवर्स परिसरातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
