स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ ची महाअंतिम फेरी पुण्यात
- डॉ. वैशाली पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती; येत्या ८, ९ डिसेंबरला रंगणार अंतिम फेरीचा थरार
- देशभरातून आलेल्या २५ संघांच्या संशोधन, कौशल्याचे होणार सलग 36 तास सादरीकरण
पुणे: केंद्रीय शिक्षण मंत्रालय, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि इनोव्हेशन सेल (शिक्षण मंत्रालय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ (सॉफ्टवेअर एडिशन) महाअंतिम फेरी पुण्यातील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयस्क्वेअरआयटी) येथे होणार आहे. येत्या सोमवारी (ता. ८) सकाळी ८ ते मंगळवारी (ता. ९) रात्री ८ अशी सलग 36 तास ही हॅकेथॉन रंगणार असून, अंतिम फेरीत देशभरातून दाखल झालेल्या २५ संघांचा थरार पाहायला मिळणार आहे, अशी माहिती ‘आयस्क्वेअरआयटी’च्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी ‘आयस्क्वेअरआयटी’च्या विश्वस्त अमृता कटारा, उपप्राचार्या प्रा. माधुरी रेड्डी, प्रा. रवींद्र जोशी, स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे प्रा. प्रकाश क्षीरसागर व प्रा. मंदार दातार आदी उपस्थित होते.
डॉ. वैशाली पाटील म्हणाल्या, “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल आणि ‘एआयसीटीई’ यांच्या संयुक्त विद्यमाने २०१७ मध्ये सुरु करण्यात आलेली राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे. जगातील सर्वात मोठ्या ओपन इनोव्हेशन मॉडेलपैकी एक असलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांना विविध मंत्रालये, विभाग, उद्योग आणि सामाजिक क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रेरणेतून, तसेच शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मुजुमदार व जयंत चौधरी, शिक्षण सचिव विनीत जोशी, ‘एआयसीटीई’चे चेअरमन टी. जी. सीताराम, व्हाईस चेअरमन डॉ. अभय जेरे यांच्या मार्गदर्शनात ही स्मार्ट इंडिया हॅकेथॉन होत आहे. यंदा या स्पर्धेचे संयोजन करण्याची संधी ‘आय स्क्वेअर आयटी’ ला मिळाली, याचा आनंद आहे.”
“सोमवारी सकाळी ८ वाजता स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर विविध फेऱ्यांमधून २५ संघ आपले कौशल्य दाखवणार आहेत. मंगळवारी रात्री ८ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचा पारितोषिक समारंभ होणार आहे. स्मार्ट ऍटोमेशन, फिनटेक, फिटनेस अँड स्पोर्ट्स, स्पेस टेक्नॉलॉजी, हेरिटेज अँड कल्चर, मेडिटेक, हेल्थकेअर, कृषी, ग्रामीण विकास, स्मार्ट व्हेईकल्स, ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स, रोबोटिक अँड ड्रोन, क्लीन अँड ग्रीन टेक्नॉलॉजी, शाश्वत ऊर्जा, सायबर सुरक्षा, स्मार्ट एज्युकेशन, आपत्ती व्यवस्थापन आदी विषयांत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रकल्प साकारले आहेत,” असेही डॉ. वैशाली पाटील यांनी नमूद केले.
