February 15, 2026

स्त्री मध्ये पिढ्या घडवण्याची ताकदज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे यांचे मत ; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्यावतीने सातवा आदर्श माता पुरस्कार संपन्न

0
IMG-20250902-WA0045
Spread the love


पुणे ः असंख्य योन्यांमधून मिळालेला मानवजन्म हा मोठा लाभ आहे आणि या जन्मात सतत चांगल्या गोष्टी घडवत राहिले पाहिजे. यातही स्त्री जन्म मिळणे हे आणखी भाग्याचे, कारण स्त्री मध्ये ममत्व असते, पिढ्या घडविण्याची ताकद असते. दूधात मिसळलेले पाणीही राजहंस ओळखतो आणि शुद्ध दूध वेचून घेतो. तसेच आपणही जीवनातील चांगल्या गोष्टी निवडत पुढे जाणारे ‘राजहंस’ व्हावे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्यावतीने ७ वा आदर्श माता पुरस्कार विमला भंडारी, कुशावर्ता गीते, प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे यांना नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी माजी महापौर अ‍ॅड. कमल व्यवहारे, अक्षरधाम मंदिर पवई चे विश्वानंद परमहंस सदगुरु स्वामी, जितो एपेक्स इंटरनॅशनलचे विजय भंडारी, तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होत्या. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, साडीचोळी, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

अ‍ॅड. कमल व्यवहारे म्हणाल्या, आजकाल अनेक सुशिक्षित लोक आपल्या आई-वडिलांना वेळ देत नाहीत आणि त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात. त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्यक्षात आई-वडिलांना आपल्या मुलांचे आणि नातवंडांचे सुख-समाधान पाहण्यातच खरा आनंद मिळतो., असेही त्यांनी सांगितले.

विजय भंडारी म्हणाले, दगडाला मूर्तीत रुपांतर करायचे असेल तर कारागीर लागतो. तसेच जीवनाला दिशा देण्याचे काम आणि मुलांना घडविण्याचे काम आई करीत असेत. आई – वडिलांना परमेश्वराचा दर्जा दिला तर वृद्धाश्रमच राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. भरत गीते म्हणाले, आई-वडिल मुलांना परदेशात शिकायला पाठवतात. त्यानंतर मुले आई वडिलांना सोडून तिथेच स्थायिक होतात. त्यापेक्षा परदेशात शिका, पुन्हा भारतात या आणि देशाचा विकास करा, असेही त्यांनी सांगितले.

पुरस्काराला उत्तर देताना ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या, जाधवर शैक्षणिक संस्थेत गरजूंना कमी खर्चात शिक्षण दिले जाते. श्रीमंताच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु गरजू गरीब विद्यार्थ्यांना कमी खर्चात शिक्षण मिळाले पाहिजे, असेही नेत्यांनी सांगितले. अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी आभार मानले.

  • फोटो ओळ : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्यावतीने ७ वा आदर्श माता पुरस्कार विमला भंडारी, कुशावर्ता गीते, प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे यांना नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी