February 16, 2026

अधिक मानवीय होण्यासाठी वाचन उपयुक्त : लक्ष्मीकांत देशमुखअवांतर वाचन हे निरंतर, आनंददायी शिक्षणच : लक्ष्मीकांत देशमुखवाचन उन्नत मानवी संस्कृती : लक्ष्मीकांत देशमुखअखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या पुरस्कारांचे वितरणअभिनव वाचन उपक्रमातील विद्यार्थ्यांचा गौरव

0
IMG-20250802-WA0033
Spread the love

पुणे : वाचनातून घडणारे संस्कार महत्त्वाचे असतात. चारित्र्यवान पिढी घडण्यासाठी बालवयापासून मुलांना वाचनाची गोडी लावणे आवश्यक आहे. वाचन हे मानवनिर्मित कृत्रिम माध्यम असले तरी ती उन्नत मानवी संस्कृती आहे. वाचनातून जिज्ञासा वाढीस लागते आणि त्यातूनच आकलन वाढते. वाचन आपल्या प्रत्येकाच्या प्रगतीचा एक भाग आहे. अधिक मानवीय होण्यासाठी वाचनच उपयुक्त आहे, असे प्रतिपादन ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे सन 2024 वर्षातील राज्यस्तरीय विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण आज (दि. २) लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी देशमुख ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदर्भ तज्ज्ञ व ग्रंथ प्रसारक प्रसाद भडसावळे होते. संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राजेंद्र झुंजारराव, मॉडर्न महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. निशा भंडारे, संजय ऐलवाड व्यासापीठावर होते. मॉडर्न महाविद्यालयातील मराठी विभागाच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रम महाविद्यालयातील लता मंगेशकर सभागृहात झाला. सन्मानपत्र, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. अभिनव वाचन उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशस्तिपत्र, ग्रंथभेट देऊन करण्यात आला. वाचनासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विश्वस्त राजेंद्र कुलकर्णी व कार्यकारिणी सदस्य शिवाजी चाळक, सचिन बेंडभर हे उपस्थित होते.
अवांतर वाचन हे निरंतर, आनंददायी शिक्षणच आहे, असे सांगून देशमुख पुढे म्हणाले, राज्यकर्ते लोकशाही टिकवित नाहीत तर सजग नागरिक ती टिकवितात. सजग नागरिक बनण्यात वाचनाचे मोठे योगदान आहे. लेखक, प्रकाशक, चित्रकार, वाचक आणि ग्रंथालये हे वाचन संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहेत. आजच्या बालपिढीचे भावविश्र्व बदलते आणि आव्हानात्मक आहे, त्या भावविश्र्वात बाल साहित्य लेखकाने डोकावले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रसाद भडसावळे म्हणाले, संस्कार ही लादण्याची नव्हे तर अनुकरण करण्याची गोष्ट आहे. मुलांनी काय वाचावे यावर बंधने आणू नयेत; परंतु चांगल्या साहित्यकृती उपलब्ध करून दिल्या तर मुले नक्कीच आवडीने वाचतात. पालक मुलांना वास्तववादी जगात जगण्यासाठी हतबल करत आहेत, त्यांना कल्पनावादी अनुभव घेऊ देत नाहीत. परंतु मुलांचा सर्वांगिण विकास साधायचा असल्यास त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणे आवश्यक आहे आणि तो वाचनातूनच मिळणार आहे.
पुरस्कार प्राप्त लेखकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना कल्पना मलये म्हणाल्या, बालसाहित्यविषयक क्षेत्रात गेली ५० वर्षे कार्य करणाऱ्या मातृसंस्थेकडून पुरस्कार मिळणे ही आनंदाची बाब आहे. बालकांचे भावविश्र्व समजून घेत त्यांच्यासाठी साहित्यकृती निर्माण करणे ही अवघड गोष्ट आहे. शिक्षकांनी अनेक चळवळी, उपक्रमातून विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करावेत.
प्रास्ताविकात माधव राजगुरू यांनी संस्थेच्या ५० वर्षांच्या वाटचालकीचा आढावा घेत संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कांविषयी अवगत केले. संस्थेच्या माध्यमातून सातारा येथे बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. प्राचार्य प्रा. राजेंद्र झुंजारराव, डॉ. निशा भंडारे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय ऐलवाड यांनी केले.
फोटो ओळ : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित मान्यवरांसह पुरस्कारप्राप्त लेखक आणि वाचन चळवळीत सहभागी झालेले. विद्यार्थी.
प्रति,
मा. संपादक
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे देण्यात येणार्‍या सन 2024 वर्षातील राज्यस्तरीय विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण आणि अभिनव वाचन उपक्रमातील विद्यार्थ्यांचा गौरव आज (दि. २) करण्यात आला. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्ध द्यावी ही विनंती.
अनिल कुलकर्णी, कार्याध्यक्ष
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस 9922907801

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी