February 15, 2026

कलावंतांनी उद्योजकीय मानसिकता घडवावी : चारुहास पंडित

0
IMG-20250613-WA0041
Spread the love

पुणे : नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण विषयात शैक्षणिक संधी उपलब्ध होणार आहेत. प्रत्येकाने सतत शिकत राहून स्वत:ला समृद्ध करण्याची आज गरज आहे, असे सांगून सृजन आर्ट गॅलरीचे संचालक, सुप्रसिद्ध चित्रकार चारुहास पंडित यांनी आपला कला क्षेत्रातील प्रवास उलगडला.

‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ या उपक्रमाअंतर्गत ‌‘कला, उद्योजकता आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन‌’ या विषयावर बालगंधर्व कलादालनात आज (दि. 13) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चारुहास पंडित बोलत होते. या चर्चासत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविद्याशाखेचे डीन डॉ. संजय तांबट, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील यांचा सहभाग होता.

शिक्षण, संस्कार कधीही वाया जात नाहीत. कलावंतांनी उद्योजकीय मानसिकता घडवावी असे सांगून चारुहास पंडित म्हणाले, प्रयोगशीलता आणि ज्ञानसंपादन यांची सुयोग्य सांगड घातल्यास उद्योजकता क्षेत्रात करिअरच्या संधी शोधत नवनिर्मितीचा आनंद घेत यशस्वी होता येते. वक्तृत्व, संवाद कौशल्य, आत्मविश्वास, ध्येयप्राप्ती आणि व्यवस्थापन या क्षेत्रांचाही विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

डॉ. संजय तांबट म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील कृत्रिम भेद नष्ट करून विद्यार्थ्यांना जे आवडेल, रुचेल ते शिक्षण घेता यावे याकरिता नवीन शैक्षणिक धोरण महत्त्वाचे ठरणार आहे. आज आपण शैक्षणिक परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहोत. अशा वेळी नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे कौशल्यविकास तसेच रोजगाराच्या संधींची उपलब्धता होईल.

अध्यक्षपदावरून बोलताना बाळ पाटील यांनी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या कार्याची माहिती देऊन, व्यक्तीने सतत विकासाचा वेध घेत उत्क्रांत होत राहणे आवश्यक आहे, असे सांगितले. कौशल्य विकसित करणे हे पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या कार्याचे मुख्य ध्येय आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदुला टोकेकर यांनी केले.

नवीन गोष्टी शिकण्याचे स्वातंत्र्य : डॉ. अरविंद शाळीग्राम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या रिसर्च पार्क फाऊंडेशनतर्फे‌‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि करियरच्या संधी‌’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात रिसर्च पार्क फाऊंडेशनचे सीईओ डॉ. अरविंद शाळीग्राम,भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे संचालक शारंगधर साठे यांचा सहभाग होता.
डॉ. अरविंद शाळीग्राम म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासावरच आधारलेले आहे. विद्यार्थ्याला ज्या-ज्या गोष्टी शिकाव्याशा वाटतात त्या सर्व गोष्टी शिकण्याचे स्वातंत्र्य यामुळे मिळाले आहे. परिवर्तनशीलता आणि स्वातंत्र्य या तत्त्वांवर आधारित शिक्षण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध वाटा दाखविणे शिक्षक व पालकांना सहजसाध्य होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची संरचनाही त्यांनी सांगितली.
शारंगधर साठे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी गुणवंत शिक्षक, पायाभूत सुविधा आणि साहित्य यांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरण अद्याप पूर्णपणे अंमलात आलेले नसले तरी आजच्या शिक्षण प्रणालीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विषय उलगडून दाखविताना कलात्मक पद्धतीने शिकविणे, विषयाचे सखोल ज्ञान देणे आवश्यक आहे. माहितीचे रुपांतर ज्ञानात होण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ यांनी केले.

फोटो ओळ : बालगंधर्व कलादालन : ‌‘कला, उद्योजकता आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन‌’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलताना डॉ. संजय तांबट. समवेत चारुहास पंडित, बाळ पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी