उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी तहसील कार्यालयावर रुग्ण हक्क परिषदेतर्फे जागरण गोंधळ आंदोलन
पुणे: गरीब रुग्णांना उपचार व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महत्वपूर्ण असलेल्या उत्पन्नाचे दाखले देण्यात पुणे शहर व हवेली तहसील कार्यालय जाणूनबुजून दिरंगाई करत आहे. रुग्णांचे डिस्चार्ज झाले, विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया संपत आली, तरी गरजुंना उत्पन्नाचा दाखला मिळत नाही. हे दाखले त्वरित दिले जावेत, या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
शिवाजी रस्त्यावरील मामलेदार कचेरीसमोर रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात गोंधळी, संयोजक शहराध्यक्ष अपर्णा मारणे-साठ्ये, कविता डाडर, प्रभा अवलेलू, सोनाली ओव्हाळ, रेखा वाघमारे, चित्रा साळवे, सुरेश फाले, रेश्मा जांभळे, अशोक भोसले, राजेश अडसूळ, अमृता जाधव, राजाभाऊ गायकवाड, राजाभाऊ कदम, शारदा लडकत, गौरी चव्हाण, सुलभा क्षीरसागर, डॉ. योगेश कदम, डॉ. सुनील साळवे, आशिष गांधी, इकबाल शेख, फारुख सोलापूरे, विमल सोंडे, अनिता चिंचोलीकर, मंदार देसाई, दिलीप ओव्हाळ, सविता चौहान, सुनील मालुसरे, मनोज ढोणे, मुकुंद पायगुडे, विनोद बाफना, सलीम शेख, संगीता रुद्राप, साईराज जांभळे, आदित्य कांबळे, लक्ष चौधरी, युवराज साळुंखे, मीरा दोडके, रजनी पाचंगे, मंगल रासगे, निशा गायकवाड, हसीनाआपा सय्यद, मंदाताई साठे आदी उपस्थित होते.
उमेश चव्हाण म्हणाले, “रुग्णांचे डिस्चार्ज झाले, तरी उत्पन्नाचे दाखले न देणाऱ्या, निद्रिस्त हवेली आणि पुणे शहर तहसीलदारांना झोपेतून जागे करण्यासाठी हे धार्मिक स्वरूपाचे जागरण गोंधळ आंदोलन आहे. गेल्या एक महिन्यांपासून उत्पन्नाचे दाखले देण्यात वेळखाऊ धोरण सुरु आहे. त्यामुळे मोफत आरोग्य योजनेचा लाभ घेता येत नाही. खाजगी ई-सेवा केंद्रात मनमानी पद्धतीने पैसे घेऊनही दाखला मिळायला २०-२५ दिवस लागतात. विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. घरेदारे विकून, सोनेचांदी गहाण ठेवून, कर्ज काढून रुग्ण व विद्यार्थी वेळ भागवून नेतात. मात्र, योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले मिळत नाहीत. त्यामुळे त्यांची घरे उद्ध्वस्त होत आहेत. हे टाळण्यासाठी उत्पन्नाचे दाखले वेळेत द्यावेत, ही मागणी या आंदोलनाद्वारे आम्ही करत आहोत.”
